गझल हा जसा कवितेचा सशक्त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्न.
२३ ऑक्टोबर, २०१२
रविप्रकाश : एक गझल
किती घासू ललाटाला नशीबाला गिळे भाकर;
उपाशी ठार मेल्यावर चितेवरही छळे भाकर.
तुझ्या समृद्ध राष्ट्राचे भिडे का पोट पाठीला?
कुपोषण पाहुनी येता चुलीवर हळहळे भाकर.
पसरले हात असते तर किती श्रीमंत असतो मी?
कळेना मूर्ख कष्टाला फुकाचीही मिळे भाकर.
तिला मी पाहिले तेव्हा भडकली आग पोटाची;
किती लागू तिच्या मागे...पुढे साली पळे भाकर.
चला फडतूस डिगर्यांनी विणूया दोर फाशीचा;
फटीचर नोकरीसाठी जवानीची जळे भाकर.
कितीदा स्वाभिमानाने भुकेला ठेचले आम्ही;
तशी तर रोज कुत्र्याला तुपासोबत मिळे भाकर.
८ ऑक्टोबर, २०११
रविप्रकाश : तीन गझला
१.
व्यथाराणी
सुखाने हाय जगण्याला किती छळले व्यथाराणी;
तुला टाळू नये कोणी मला कळले व्यथाराणी.
फुले व्हावीत अश्रूंची असे तेव्हा ऋतू होते;
तिच्या स्मरणात रडण्याचे दिवस ढळले व्यथाराणी.
कुणी समजावुनी सांगा अता या सांत्वनालाही;
रुमालाने पुन्हा अश्रू किती जळले व्यथाराणी.
सुखाच्या चक्रव्यूहाने मलाही घेरले होते;
सुखाने मारले असते,मरण टळले व्यथाराणी.
कधी मी मांडला नाही गडे आकांत जन्माचा;
युगाचे कोरडे अश्रू कुठे गळले व्यथाराणी?
महालातून रस्त्यावर सखी आली जराशी तर;
फुलांचे पाय मातीने म्हणे मळले व्यथाराणी.
प्रतीक्षा फोडते डोळे,छळे अंधार जन्माचा;
पुन्हा दारात अश्रूंचे दिवे जळले व्यथाराणी.
२.
जीवन
जरी चालतांना तुला वाट डसते;
तुझ्या पावलांना फुटो राजरस्ते.
तिच्या सावलीला बसा सूर्यदेवा;
कळू द्या तुम्हाला, कशी माय असते.
तिच्या सोसण्यावर रडे वेदनाही;
तिच्या दिल्लगीवर किती दु:ख हसते.
तवंगापरी मीपणा वर तरंगे;
बुडाल्याविना काय जीवन समजते.
३.
मॅडम
एकांत शाप असतो केव्हा कळेल मॅडम;
भर पावसात सारी काय जळेल मॅडम.
कुठल्या नशेत तुजला मी पाहिले कळेना;
आयुष्यभर तुझ्या मी मागे पळेल मॅडम.
तुमच्यात एक मुलगी हसते म्हणे निरंतर;
तुमचा झरा कधी हो वर खळखळेल मॅडम.
क्रोधाग्नि तो कुणाचा शृंगार होत नसतो;
हसुनी कटाक्ष टाका,सागर जळेल मॅडम.
देहामधेच बसतो लपुनी भुकंप कैसा;
तुम्हास वयपरत्वे हेही कळेल मॅडम.
१७ ऑक्टोबर, २०१०
एक गझल : रविप्रकाश
२७ सप्टेंबर, २००९
चार गझला : रवीप्रकाश
१. तेजाब
उचलाल पाय जेव्हा ध्येयापुढे पळाया;
येतील ध्येय लाखो पायात घुतामलाया
मी पाळण्यात माझ्या दाही दिशा उडालो...
मी जन्मलोच जैसा हाती हवा धराया.
होईल का जगाचा व्यवहार पारदर्शी;
घेतात लाच ऐने आम्हास ओळखाया.
त्यांना सवाल कैसा तू टाकला कळेना?
ते लागलेत सारे मेंदूस विंचराया.
जीवन-मरण तुम्हाला असतील भोग छप्पन;
हा लागलो बघा मी श्वासाविना जगाया.
माझाच प्रार्थनेने तो देव होत गेला...
लागेल वेळ थोडा त्याचा दगड कराया.
जन्मास आग लागो बेदर्द पावसाच्या;
आला कसा बघाना तेजाब शिंपडाया!
२. नांगर
नुसत्याच कुंडल्या जर काढाल कॉम्प्यूटरवर;
पाहून माणसाला मागे फिरेल मांजर.
मजला जिवंत ठेवी माझी उपासमारी;
शोधात भाकरीच्या मेले किती सिकंदर.
बारूद खात होती गर्भार माय माझी;
सांगा नवल कशाचे मी आग ओकली तर.
कंगाल जन्मण्याची शिक्षा अशी अघोरी;
हर एक गोल वस्तू वाटे भुकेस भाकर.
जर वाटते तुम्हाला जन्मास धार यावी?
लावा खुशा खंजर अपुल्याच काळजावर.
राहोत सज्ज पुतळे आता विटंबनेला;
नांदो सुखात दंगल देवा तुझ्याच भूवर.
सांगू नको पिकांना नुसत्या ढगाळ गोष्टी;
पोटात तू ढगांच्या खुपसून टाक नांगर!
३.मशाल
अमुच्या पराभवाचा सत्कार काल होता;
आम्ही भल्याभल्यांचा पुसला गुलाल होता.
आली कणाकणाने डोळ्यात वाळवंटे;
पाणीच मागण्याचा साधा सवाल होता.
तेव्हाच काळजाची ही आग शांत झाली;
कापून सुर्य जेव्हा केला हलाल होता.
माझा लिलाव झाला येथे क्षणाक्षणाला;
एकेक श्वास जैसा साला दलाल होता.
मी चुंबिले तिला अन् उठली हजार बोटे;
का तो खुल्या गटाचा राखीव गाल होता.
गंगे तुझ्या कपाळी हे प्रश्नचिन्ह कैसे;
पाण्यात रक्त होते की रंग लाल होता?
शहरात सांत्वनाची कैसी प्रथा कळेना;
फोडून काल डोळे गेला रूमाल होता.
आजन्म मज मिळाली नाबाद सूर्यसत्ता;
जो भेटला मला तो झाला मशाल होता.
४. भाऊ
ज्यांना फुलाफुलांचा झाला अपाय भाऊ;
मरणाशिवाय नाही त्यांना उपाय भाऊ.
आम्हास का मिळावे पाणी तहानलेले;
पाण्यावरी कशी हो तुमच्याच साय भाऊ.
मी शिंपडू कशाला अत्तर कळयाफुलांवर;
अभिजात नाक माझे तितके कुठाय भाऊ?
गोरक्षणार्थ जमले खाटीक हे पुणेरी;
काढा विमा तिचाही जाणार गाय भाऊ.
संसर्ग माणसांचा झाला कसा ऋतुंना?
आली फुले कशी ही जातीनिहाय भाऊ!
८ ऑक्टोबर, २००८
मी शब्द बोललेला : रविप्रकाश

२८ एप्रिल, २००८
माझ्या पुढे भविष्या जाण्या तुला मनाई
जर मीच संपलो तर कसली तुझी कमाई ?
येईल अमृताची तेव्हा जरूर गोडी,
गाळून घाम जेव्हा आम्ही करू मिठाई.
जीवन कलंदरीच्या इतक्या उनाड वाटा,
माझीच हाक मजला परतून येत जाई.
आता विरंगुळ्याला नुसता रवंथ उरला-
"आम्ही भल्याभल्यांची केली कशी धुलाई!"
येतील ध्येय लाखो पायात घुटमळाया;
वाटेत पापण्यांना जर अंथरेल बाई.
मोहा तुझ्या फुलांवर तेजाब शिंपडू का?
हा बाप बेवडा मज मागे नवीन आई.
हे राहिले असे तर होणार काय नाही?
मागेल आंधळ्यांना मग सूर्य रोशणाई.
- रविप्रकाश
९९२१२९७२९७
