१२ ऑक्टोबर, २०१०

डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जीवन-गौरव पुरस्कार



मुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे मराठी गझल लेखनातील प्रदीर्घ आणि मौलिक योगदानाबद्दल दरवर्षी ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन-गौरव पुरस्कार देण्यात येतो.यंदा हा पुरस्कार ख्यातनाम मराठी गझलकार डॉ.श्रीकृष्ण राऊत यांना जाहीर झाला आहे.९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे होणा-या गझलोत्सवात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.

मागील पस्तीस वर्षापासून डॉ.राऊत यांनी मराठीतील दर्जेदार नियतकालिकातून गझल लेखन केले आहे.‘गुलाल आणि इतर गझला’ हा त्यांचा गझलसंग्रह प्रसिद्ध आहे.

पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ह्या दिग्गजांनी राऊतांच्या गझलांना वाखाणले आहे.नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनातील ‘सुरेश भट स्मृति गझल वाचन सत्राचे’ अध्यक्षपद डॉ.राऊत यांनी भूषविले आहे.

दशरथ पुजारी,सुरेश वाडकर,सुधाकर कदम,भीमराव पांचाळे,स्वाती पोहनकर,राजेश उमाळे,रफिक शेख,मदन काजळे,दिनेश अर्जुना इ.गझल गायकांनी त्यांच्या गझला गायिल्या आहेत.

‘मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता?’ हा त्यांचा गाजलेला लेख ‘विकिपिडिया’ वर सुरेश भटांच्या‘बाराखडी’सोबत समाविष्ट करण्यात आला आहे.

‘माझी गझल मराठी’ या राऊतांच्या ब्लॉगची इंटरनेटवर तेरा हजाराहून अधिक पृष्ठे जगभर वाचल्या गेलीत. त्यांनी संपादित केलेल्या ‘गझलकार’ब्लॉगवरील सुरेश भट विशेषांक,सुधाकर कदम विशेषांकाला संपूर्ण विश्वातून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.मराठी साहित्य क्षेत्रात डॉ.राऊत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: