२७ सप्टेंबर, २००९

तीन गझला : वंदना पाटील


१. लाचार

जरी अर्ध्यात मी तेव्हा उठाया लागलो होतो;
तुझ्या बेचैन हाकांनी वळाया लागलो होतो.

कसा ना राहिला माझा गडे माझ्यावरी ताबा;
उगी ह्या मृगजळामागे पळाया लागलो होतो.

कुणाला शोधतो आहे मनाच्या गूढ अंधारी;
खुळे आभास छातीसी धराया लागलो होतो.

अरे हंगाम शोधाया निघाली पाखरे कोठे?
मला कळले न केव्हा मी वठाया लागलो होतो.

जरी आमंत्रणे देती तुझे ते लाघवी डोळे;
कशाला उंब-यापाशी अडाया लागलो होतो.

कसा लाचार मी झालो कळेना एवढा येथे;
जगाच्या हासण्यासाठी हसाया लागलो होतो.

२. व्यवहार

भरला सभोवताली बाजार माणसांचा;
वाटे नको नकोसा शेजार माणसांचा.

गर्दीच श्वापदांची झाली सभोवताली;
शोधून सापडेना आधार माणसांचा.

गेली रसातळाला केव्हाच लोकशाही;
तेजीत चाललेला व्यापार माणसांचा.

मोठेपणा असा की शृंगारती मढ्यांना;
करतो कुणी कशाला सत्कार माणसांचा.

बोलून गोड येथे होतात घाव पाठी;
हा कोणता कळेना व्यवहार माणसांचा.

३.चाफा

माणसांनी माणसांना टाळतांना पाहिले;
या इथे मी भावनांना जाळतांना पाहिले.

स्वागतासाठी इथे माझ्या कधी ते बोलले;
मागचा संदर्भ सारा गाळतांना पाहिले.

वाटते झाली विषारी येथली सारी हवा;
मोग-याचे झाड दारी वाळतांना पाहिले.

काळजापाशी असे तू ठेवले आहे मला;
डायरीचे पान जेव्हा चाळतांना पाहिले.

बोललो मृत्यूस मी आलास थोडा थांबना;
मी तुला केसात चाफा माळतांना पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: