२७ सप्टेंबर, २००९

तीन गझला : वीरेंद्र बेडसे



वीरेंद्र बेडसे
९४२१८८६०९२

१. वाट

पुन्हा जुने-नवे हिशेब मी किती करायचे?
जिवंत प्रश्न शेवटी तुला कसे भुलायचे?

दिव्या-दिव्यास लाभते हरेक ज्योत पेटती;
तुझ्याविना कशास मीच एकटा जळायचे?

उदास जिंदगी जरी,सखे नकोस घाबरू;
सनातनी बुरूज हे कधीतरी ढळायचे.

तमास भेदण्यास या नकोत चंद्र-तारका;
धरून एक काजवा पुढे-पुढेच जायचे.

निळ्या नभी भरारतात लक्ष-लक्ष पाखरे;
भरारणे असे तुला गडे कधी जमायचे?

कठीण वाट,बिकट वाट जीवना तुझी जरी;
पडायचे...उठायचे... जगावया झटायचे.

२.व्याख्या

टाळलेस तू मागे बघणे वळता-वळता;
ती नजरेची भेट राहिली घडता-घडता.

या मातीचा लळा असावा सूर्यालाही;
हिरमुसला तो,उदास झाला ढळता-ढळता.

हरला शर्यत ससा धुरंधर मला पटेना;
दिसली त्याला प्रिया असावी पळता-पळता.

वेड विलक्षण बघ रात्रीचे काजव्यासही;
नदीकिनारी सखी शोधतो जळता-जळता.

या प्रेमाच्या अन् प्रीतीच्या अनंत व्याख्या;
कळेल तुजला प्रेम काय ते कळता-कळता.

३.संकटे

तू मला पाहू नको,झुरतात आता संकटे;
वाट माझी अडवुनी बसतात आता संकटे.

संकटांना नाव नाही, गावचा पत्ता नसे;
वारसा शोधावया फिरतात आता संकटे.

दार केले बंद मी,पर्याय त्यांनी काढला;
कवडसा कवटाळुनी शिरतात आता संकटे.

बाजरी,ज्वारी,गहू आहेत हंगामी पिके;
बारमाही पण इथे पिकतात आता संकटे.

मानतो थोतांड मी पंचांग सारे अन् तिथ्या;
काळरेषेची दिशा रचतात आता संकटे.

हे खरे‘वीरेंद्र’पण तू ध्येयही सोडू नको;
झुंजण्याला जिद्दही भरतात आता संकटे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: