११ सप्टेंबर, २०११

'खुद को जब जब भी तनहा पाया है ': डॉ. गणेश गायकवाड (आगाज)

प्रिय रसिक,

उर्दू गझलमध्ये काही गोष्टी चिरंतन राहिल्या आहेत. पाचशे वर्षांपासून उर्दू गझलमध्ये तनहाई, हुस्न, इश्क, शबाब ह्या गोष्टी सर्रास वापरल्या जायच्या, जातात. आता काळ बदलला तरी वेगळ्या संदर्भात या शब्दांचा वापर शायर करताना दिसतो. जेव्हा शायर प्रेम, इश्क याविषयी आपली गझल सादर करतो किंवा शेर सादर करतो तेव्हा ते प्रेम इश्क हकीकी म्हणजे ईश्‍वरीय असू शकते किंवा इश्क 'मजाजी' भौतिक, सांसारिकही असू शकते. शायर कुठल्या प्रेमाविषयी बोलतो हे सांगणे जरा कठीणच उदा. शायर म्हणतो.
खुदको जब जब भी तनहा पाया है
सामने तेरा चेहरा आया है ।।
तेरी खुशबू है मेरी सांसो मे
मेरी धडकने में तू समाया ।।
तुझको छू कर यकीन कर लू मै
मेरे कितने करीब आया है
या शेरांमध्ये शायर आपल्या प्रेयसीविषयी म्हणतो की, परमेश्‍वराविषयी सांगणे कठीण. वाचकाने आपल्या आवश्यकतेप्रमाणे तो शेर वापरावा, अशी सोय मात्र त्याने करून ठेवली आहे. जे न देखे रवि ते देखे कवी, असे मराठीमध्ये आपण नेहमी म्हणतो. आपल्या कल्पनेच्या भरार्‍या मारणार्‍या शायराविषयी उर्दूमध्ये गमतीने म्हटले जाते.
जो दुनियासे डरता है उसे कायर कहते है
जिससे दुनिया डरती है उसे शायर करते है।।
शायराविषयी एवढी भीती चेष्टेने जरी पसरविल्या जात असली तरी उर्दू गझलांच्या नजाकतीमुळे आपल्या सौंदर्यदृष्टीत भरच टाकली आहे, यात शंका नाही. जीवनातील प्रत्येक गोष्टीला काफियामध्ये गुंफणार्‍या शायरांच्या गझला काळजाला भिडतात. अल्पाक्षरांमध्ये मोठा आशय मांडण्याचं काम शायर करतो. सईद राही नावाचा शायर म्हणतो.
तुम नही, गम नही शराब नही
ऐसी तनहाई का जबाब नही ।।
गाहे गाहे (हळूहळू) इसे पढा कीजे
दिल से बढकर कोई किताब नही ।।
वो करम उंगलियो पे गिनते है
जूलम का जिनके कुछ हिसाब नही ।।
प्रत्येक शेरामध्ये वेगळा विषय आशय मांडणार्‍या ह्या गझलाचा प्रत्येक शेर स्वतंत्र कविता होऊ शकतो. मानवी जीवनातील सौंदर्य कल्पनांना उर्दू गझलने मूर्त रूप दिले. असाच एक सौंदर्यसक्त शायर होता अमीर मीनाई. अमीरची एक काळातील गझल अहिस्ता, अहिस्ता. 'टाईमलेस क्लासिक' आपल्यापैकी प्रत्येकानेच गुलाम अलीच्या आवाजातील ही गझल खूप वेळा ऐकली असेल, परंतु प्रत्येक वेळेस ती नवी वाटावी इतकी ताजी म्हणजे किमान १२५ वर्षांपूर्वीची गझल. तिचे काही शेर बघू या.
सरकती जाए है रुखसे
नकाब अहिस्ता अहिस्ता
निकलता आ रहा है
आफ्ताब आहिस्ता आहिस्ता
त्या सौंदर्यवतीच्या चेहर्‍यावरून तो 'नकाब' हळूहळू खाली सरकत जातो आणि त्या नंतर दृष्टीस पडणारं सौंदर्य म्हणजे जणू क्षितिजावरून सर्वत्र लाली पसरून सूर्य हळूहळू उदय होतो आहे असे वाटते.
जवाँ होने लगे तो
हमसे कर लिया परदा
हया इकलख्त आई और शबाब
आहिस्ता आहिस्ता।।
तारुण्य उमलण्याची चाहूल लागताच तू माझ्याशी परदा करायला लागली. लज्जा अशी अचानक अवतरली आणि सौंदर्य मात्र हळूहळू चोर पावलांनी चेहर्‍यावर जाणवलं.
शबे फुर्कत का जागा हूँ
फरिश्तों अब तो सोने दो
कभी फुर्सत मे कर लेना हिसाब,
आहिस्ता आहिस्ता
माझा प्राण गेला. माझ्या कबरेत मी निपचित शांतपणे चिरनिद्रा घेतोय. पण हे काय? देवदूत माझ्या पापपुण्याचा निवाडा करण्यासाठी मला झोपेतून उठवू पाहत आहे. हे देवदूतांनो आयुष्यभर मी जागतच होतो मला आता तर झोपू द्या. नंतर कधी तरी सावकाश पापपुण्याचा हिशेब करूया.
'वो बेदर्दी से सर काटे' 'अमीर'
और मै कहू उनसे
हूजर आहिस्ता, आहिस्ता,
जनाब आहिस्ता आहिस्ता
ती कठोर होऊन माझ्या गळ्यावर सुरी चालवते व मी मात्र म्हणत आहे. हुजूर थोडे हळू, थोडे धिराने घ्या.
या गझलच्या प्रत्येक शेरामध्ये अमीरने जीवनात 'आहिस्ता' आहिस्ता करण्याच्या काय काय गोष्टी आहेत जणू हेच रसिकांना सूचित केले आहे. आजचे जीवन एवढं गतिमान झालयं की आम्हाला आता एकमेकांशी, आप्त मित्रांशी बोलायला भेटायला वेळ मिळत नाही. आपली हीच व्यथा शेरामध्ये मांडताना जावेद अख्तर म्हणतो
पहले मिलते थे तो वक्त चुराकर लाते थे
अब मिलते है जब भी फूर्सत हौती है

-----------------------------------------

मो.नं.९८५0१३५४0५

1 टिप्पणी:

manohar soman म्हणाले...

Very very nice......