९ ऑक्टोबर, २०११

मराठी गझलगायकीचा मागोवा : डॉ.राजेश उमाळे








1971 ते 1980 या काळातील गझल



सुरेश भट, कवी विं.दा. करंदीकर, कुसुमाग्रज इत्यादी कवींच्या गझल रचनांचे अध्ययन करून 1970 या वर्षी ध्वनिमुद्रित झालेली सुरेश भटांची ‘पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्युत व्हावी’ ही पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्घ केलेली रचना उदाहरणादाखल या प्रकरणात घेतली. संगीताच्या दृष्टीने तथा गायकीच्या ञ्ृष्टीने किंबहुना गझल गायकीच्या विकासाच्यादृष्टीने गझल गायकीत कोणकोणते बदल होत गेले.

19071 ते 1980 या दशकातील गझलकारांच्या गझलांचे व संगीतबद्घ रचनांचे अध्ययन केले असता गझल रचनाकारांमध्ये मागच्या दशकातील गझलकारांबरोबरच म्हणजेच सुरेश भट, करंदीकर, शांता शेळके, कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर, ना.घ. देशपांडे, भ. श्री. पंडित इत्यादी रचनाकारांमध्ये या दशकातील महत्त्वाची भर म्हणजे आरती प्रभू, अनिल, हिमांशु कुलकर्णी, प्रकाश ताडले इत्यादी कवींच्या रचनांची या दशकात उपलब्धी झाली. यावरूनच असे निर्देशनास येते की गझलांच्या रचनांचा मोह तत्कालीन कवींना पडून हे कवी आपल्या प्रतिभेची अभिव्यक्ती गझल रूपाने करू लागले. व आपल्या कविता संग्रहात या काही गझलांचा समावेश करून आपला काव्यसंग्रह समृद्घ करू लागले. पर्यायाने हे कविता संग्रह वाचकांच्या हातात जाऊन गझलांची ओढ सामान्य वाचकांनांही होऊ लागली. गझल रचनांना आलेले बाळसे विस्तारू लागले.

मात्र यातील किती रचनांचे संगीत दिग्दर्शन होऊन त्या रसिकांपर्यंत पोहचल्या याचा शोध घेतल्यानंतर फक्त एक रचना स्वरबद्घ होऊन तिचे ध्वनिमुद्रण झाल्याचे आढळून आले. ही रचना सुरेश भटांची असून श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्घ केली आहे. निर्मलादेवीच्या आवाजातील ही गझल मराठी गझलच्या रसिकांना एक अनुपम भेट ठरली आहे. सिनेसृष्टीतल्या गायकांना वगळून शास्त्रीय तथा उपशास्त्रीय संगीत गाणार्‍या निर्मलादेवी यांनी आपल्या आवाजाने प्रस्तुत गझलेत आपल्या गायकीने चांगलाच रंग भरला. श्रीकांत ठाकरे यांची प्रत्येक रचना ही वेगळी व रूढ परंपरेला छेद देणारी आहे. त्यांच्या विविध रचनांमध्ये शोभा गुर्टू, निर्मलादेवी, महम्मद रफी. अशा हिंदी भाषिकांना केवळ त्यांच्या सांगितीक ज्ञानामुळे व गायकीच्या दर्जामुळे या मातब्बर गायकांकडून आपल्या रचना गाऊन घेतल्या आहेत. त्यातील निर्मलादेवी यांनी गायलेली च्मी एकटीच माझी असते कधी कधीछ ही सुरेश भटांची रचना अभ्यासून तिचे सांगीतीक मूल्यमापन करत असतांनाच प्रस्तावनेसह काव्यार्थ, स्वरसौंदर्य, लयसौंदर्य, गायकी आणि समीक्षा इत्यादी निकष या गझलेसाठी लावून निष्कर्ष काढला आहे. 1971 ते 1980 च्या दशकात काव्यरचनांमध्ये गझलरचनांचा जो विकास झालेला दिसतो. तितका विकास सांगीतिकञ्ृष्ट्या झालेला आढळला नाही. दहा वर्षात केवळ एक रचना स्वरबद्घ व्हावी ही संख्या फारसे समाधान करणारी नाही आणि ध्वनिमुद्रणाच्या इतक्या अल्पप्रमाणामुळे रसिकापर्यंत ही गझल पोहचली नाही असे म्हणावे लागते.

मात्र केवळ ध्वनिमुद्रण एवढेच माध्यम प्रचार प्रसाराचे आहे असे म्हणता येणार नाही. यात अनेक लहान थोर कलाकार सहभागी होणे सुरु झाले, अशा प्रकारची माहिती प्रस्तुत प्रबंधकर्त्याला मुलाखतीवरून उपलब्ध झाली. 1विदर्भाचे गायक सुधाकर कदम यांनी गझलांचे अनेक लहान मोठे कार्यक्रम याच काळात सुरु केल्याचे त्यांच्या मुलाखतीवरून आढळून आले. मैफिलीचा दर्जा प्राप्त करणार्‍या या कार्यक्रमांनी गझलचे रसिक तयार होणे सुरु झाले. गझलचा परिचय झाला. गझलची चर्चा रसिकांच्या गटागटात सुरु झाली. एवढे श्रेय या लहान मैफिलीला द्यावेच लागेल. याच काळात निर्मलादेवी यांनी गायलेल्या गझलेची सुंदर निर्मिती समोर आल्याने रसिक गझल श्रवणासाठी उत्सुक झाले व त्यांच्या अपेक्षाही वाढणे स्वाभाविकच होते.




1981 ते 1990 या काळातील



मागील दशकात गझलचे रचनाकार म्हणून कवी श्रेष्ठ सुरेश भट, शांता शेळके, आरती प्रभू, कवी अनिल, हिमांशु कुलकर्णी, व प्रकाश तोडले इत्यादी कवींनी आपल्या गझलरचना प्रसिद्घ केल्याचे प्रकरण चार मध्ये पाहिले. 1981ते 90 या दशकात मंगेश पाडगावकर 1981, गंगाधर महाबरे 1981, सुरेश भट 1983, अनिल कांबळे 1983,उ.रा. गिरी 1983, बबन सराडकर 1984, खावर 1985, संगीता जोशी 1986, बबन सराडकर 1986, श्रीकृष्ण राऊत 1989, ल.स. रोकडे 1989, रमण रणदिवे 1990 अशा अनेक कवींनी गझल रचनांमध्ये योगदान देऊन गझल संग्रहाबरोबरच अनेक गझला उपलब्ध करून दिल्या. यामध्ये कविता संग्रहाप्रमाणेच स्वतंत्रपणे काही गझल संग्रह प्रकाशित झाले. यांपैकी मंगेश पाडगावकर यांचा ‘गझल’संग्रह, गंगाधर महांबरे यांचा मराठी गझल संग्रह,सुरेश भट यांचा `एलगार तसेच खावर यांचा ‘माझिया गझला मराठी’ हा गझल संग्रह, कवियित्री संगीता जोशी यांचा ‘म्युझिका’ गझल संग्रह व श्रीकृष्ण राऊत यांचा ‘गुलाल’ हा गझलसंग्रह प्रसिद्घ झाल्याने एक गझल रचनांची लाट संपूर्ण महाराष्ट्रात आल्याचे दिसते. यामध्ये विविध वृत्त छंदातील अनेक प्रकार लोकाभिमुख झाले. त्याचप्रमाणे संगीतकारही केवळ भावगीत- भक्तीगीते या रचनांवरच अवलंबून न राहता अनेक गझलाही स्वरबद्घ करण्याच्या मोहात पडले. अनेक रचनाकारांच्या रचना स्वरबद्घ झाल्या आणि निरनिराळ्या माध्यमांनी त्या रसिक जनांना उपलब्ध झाल्या. केवळ ध्वनिमुद्रिकांची संख्या कमी असल्याने गझलची लोकप्रियता थांबली नाही. गझलला मैफिलीतून सादर करणारे अनेक लहानमोठे कलावंत हे काम करीत राहिले. वृत्तपत्रांचाही यामध्ये महत्त्वाचा वाटा दिसून आला. यातील सहा रचना या अध्ययनासाठी निवडलेल्या आहेत. त्यापैकी 1983 ला ध्वनिमुद्रीत झालेली सुरेश भटांची ‘केव्हा तरी पहाटे’ ही रचना पं. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत बद्घ केली असून आशा भोसले यांनी गायली आहेत तर दुसरी रचना सुधाकर कदम यांनी गायलेली ‘हे तुझे अशावेळी’ ही सुरेश भटांची रचना सुधाकर कदम यांनीच संगीतबद्घ केलेली घेतली आहे. तिसरी रचना 1984 मध्ये श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्घ केलेली उमाकांत काणेकर यांची ‘उघड्या पुन्हा जहाल्या’ ही शोभा गुर्टू यांनी गायलेली रचना घेतलेली आहे. चौथी व पाचवी रचना 1984 मध्ये प्रकाशित झालेल्या ध्वनिमुद्रिकेतील कवी सुरेश भटांच्या दोन गझला रवि दाते यांनी संगीत दिग्दर्शित केलेल्या व सुरेश वाडकर यांनी गायलेल्या रचना घेतलेल्या आहे. तर सहावी रचना ही मंगेश पाडगावकरांची असून अरूण पौडवाल यांनी संगीतबद्घ केलेली तर अनुराधा पौडवाल यांनी गायलेली घेतली आहे. या अध्ययनात अरूण पौडवाल, रवि दाते, श्रीकांत ठाकरे, सुधाकर कदम हे या दशकात आलेले गझला रचना स्वरबद्घ करणारे नवे संगीतकार अध्ययनासाठी घेतले आहेत. या आधीच्या प्रकरणात श्रीकांत ठाकरे, पं. हृदयनाथ मंगेशकर या संगीतकारांच्या रचना अभ्यासिल्या होत्या. मात्र गझल रचनांना संगीत देणारे संगीतकार या काळात वाढल्याने या रचनाकारांच्या गझलांना एक सांगीतिक वैविध्य प्राप्त झाले आहेत. या प्रत्येक रचनेचा स्वतंत्रपणे अभ्यास केल्याने त्यातून निघालेले निष्कर्षही निरनिराळे आहेत व गझल गायकीच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या निष्कर्षप्रत जाण्यासाठी हा कालखंड महत्त्वाचा ठरला आहे. यात प्रत्येक रचनाकारांची, गायकाची व संगीत दिग्दर्शकांची वैशिष्ट्ये व सौंदर्यात्मक आशय विस्तारला आहे. तसाच गायकीतही विकासाच्या दृष्टीने झालेला बदल व गायकांच्या गायकीला मिळालेले स्वातंत्र्य यावर या प्रकरणात प्रकाश टाकला आहे. त्या मुळे गझलच्या वाटचालीतील स्थैर्याचा मिळालेला एक टप्पा म्हणून या दशकाचा उल्लेख करावा लागतो.



1991 ते 2000 या काळातील गझल




गझलांच्या रचनारांबरोबरच गझलांचे सांगितीकीकरण करणारे संगीतकारही गझलासाठी संगीत देण्यास पुढे आले व त्यांच्या सांगीतिक रचनाही या दशकातच स्थिरावल्या. अशा संगीतकारांमध्ये दोन प्रकार आढळतात. एक म्हणजे दुसर्‍या संगीतकारांच्या रचना गाणारे गायक व दुसरे म्हणजे स्वत:च संगीतबद्घ केलेल्या रचना स्वत:च सादर करणारे गायक. यामध्ये संगीतकार व गायक म्हणून 1993 ला भीमराव पांचाळे यांचे नाव पुढे आले तर 1994 मध्ये अशोक पत्की यांनी देखील गझल रचना स्वरबद्ध केल्या. या रचनांमध्ये सुरेश वाडकर सारख्या नामवंत कलाकारांकडून अनेक संगीत दिग्दर्शकाने रचना गाऊन घेतल्या .संगीतकार गायक आणि गझलाची गायकी विकसीत झाल्याचे या दशकातील ध्वनीमुद्रिकांच्या अध्ययनावरून निदर्शनास येते.

मराठी गझलगायकी हा नवा विषय असला तरी त्याचा विस्तार या दशकात झाल्याचे आढळते. प्रस्तुत प्रकरणात भीमराव पांचाळे या गायक संगीतकाराच्या एकूण आठ रचनांचे अध्ययन करून मराठी गझल गायकीच्या व विकासाच्या दृष्टीने या रचनांची चिकित्सा केली आहे. अध्ययनासाठी कवी उ.रा. गिरींची ‘सोडून चाललेले माझे मलाच गाणे तसेच विजय कदमांची ‘मी तुला विसरायचे राहून गेले ही रचना तर कवी खावर यांची ‘हजार दु:खे मनास माझ्या ही रचना याच बरोबर श्रीकृष्ण राऊत यांची ‘दु:ख देखणे तुझे गझलकार इलाही जमादार यांची अंदाज आरशाचा ही रचना आणि संगीता जोशी यांची ‘आयुष्य तेच आहे तर निता भिसे यांची ‘मी किनारे सरकतांना तसे म. भा. चव्हाण यांची ‘तुझा तसाच गोडवा ही गझल



2001 ते 2008 पर्यंतच्या काळातील गझल




2001 ते आजपर्यत आलेल्या सर्व नव्या जुन्या संगीतकारांच्या तथा गायकांच्या गझल रचनांचे अध्ययन करतांना काही निवडक रचनांचे संशोधनात्मक दृष्टीने विश्लेषण केले आहे. ते सारांश रूपाने देत आहोत. या कालखंडात काही जुने कवी सुरेश भट, संगीता जोशी, इलाही जमादार, रमण रणदिवे, अरूण सांगोळे, शिवाजी जवरे असे प्रस्थापित कवी सतत गझल हा प्रकार लिहित असतांना काही नव्याने गझलकार या कालखंडात समाविष्ट होतात. यामध्ये वा.न. सरदेसाई, दिलीप पांढरपट्टे, ए.के. शेख, अनिल मोरे, प्रसाद कुलकर्णी, अशोक बागवे, अविनाश ओगले, डॉ. राम पंडीत, नितीन भट, अनंत नांदूरकर, गिरीश खारकर, प्रमोद चोबितकर, प्रफुल्ल भूजाडे, प्रदिप निफाडकर इत्यादीचा समावेश होतो. गझलांच्यादृष्टीने मराठी गझलची समीक्षा ही अभ्यासकांना वाचायला मिळते. त्याचप्रमाणे दिवाळी अंकासाठी, मासिकांसाठी व वृत्तपत्रातूनही आवडीने गझलं रचना करणारे काही गझल कवी आढळतात.

सांगीतिक दृष्टीने हा कालखंड गझलच्या विकासात महत्त्वाचा ठरला आहे. अनेक नवोदित किंवा प्रसिद्घी न मिळालेले गायक गझल हा प्रकार गातात. आकाशवाणीवरून सादर होणार्‍या सुगमसंगीत या कार्यक्रमात गझलरचनांची संख्या भावगीत अभंगापेक्षा वाढली ती याच काळात. नव्या रचनाकाराच्या रचनामध्ये काव्याचे अनेक विषय नव्याने समाविष्ट झाले. प्रेम, विरहापूर्ती गझल मर्यादीत न राहता गझलमध्ये सामाजिक आशय, राजकीय स्थिती, देशभक्ती, मानवता, त्याग इत्यादी निसर्ग मूल्यांचा समावेश झाला. अनेक लहान मोठ्या बैठकी व मैफिलीतून गझल पेश केली व रसिकांनी भरपूर प्रतिसाद देन गझल गायकीला सन्मान दिला. आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमाने झालेला गझलचा प्रसार, प्रचार पाहतांना काही आकाशवाणी गायक कलाकार ज्यामध्ये मोरेश्वर निस्ताने, अनिल खोब्रागडे, दत्ता हरकरे शरद सुतवणे, रमेश अंधारे, बबन सराडकर, गोपाल कौशिक, अनिल आगरकर, प्रभाकर धाकडे, सुनील बर्दापुरकर, सौ. सविता महाजन, सुधाकर प्रधान इत्यादींना शोधून त्यांचा समावेश आम्ही या संशोधनात केला आहे. श्रीधर फडके, भीमराव पांचाळे, माधव भागवत, अवधूत गुप्ते, पद्मजा फेणाणी, आशा भोसले इत्यादी गायक संगीतकारांनी या कालखंडात मराठी गझलला समृद्घ केले. या संगीतकार गायकाच्या नामावलीतील नव्या पिढीचे गायक सुधीर फडके यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी स्वरबद्घ केलेली सुरेश भटांची‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागलेही गझल या काळाचे प्रतिनिधित्व करते. सांगीतिक दृष्टीने स्वातंत्र्योत्तर काळात गझलच्या विकासात आलेली निरनिराळी वळणे त्यामध्ये झालेली वृद्घी बदल व तिच्या गायकीच्या विकासाचे टप्पे प्रस्तुत संशोधनात आवर्जून घेतलेले आहे. काही कवींचे जसे सुरेश भट, श्रीकृष्ण राऊत, इलाही जमादार, संगीता जोशी, अरुण सांगोळे, बबन सराडकर, प्रदिप निफाडकर, गौरवकुमार आठवले, संदीप माळवी, रमण रणदिवे, दिलीप पांढरपट्टे इत्यादींचे गझलच्या विकासात महत्त्वाचे कार्य लाभलेले आहे. गझलच्या विकासाच्या दृष्टीने गझलला परिपक्व करणारे काही संगीतकार उदा. पं. हृदयनाथ मंगेशकर, सुधाकर कदम, भीमराव पांचाळे, रवि दाते, श्रीधर फडके, अशोक पत्की, नाथ नेरळकर, शरद करमरकर, विजय मोरे, बबन सराडकर इत्यादींचे महत्त्वाचे योगदान गझल

गायकीच्या दृष्टीने आढळून आले. क्रमश: या सर्वांचे विश्लेषणात्मक दृष्टीने अध्ययन करून प्रत्यक्ष संषोधनात निष्कर्ष काढले आहेत. अनेक तर्‍हेने किंवा विविध गायकीच्या पद्घतीतून गझल प्रकाराला सांगितिक दृष्टीने सजविणारे संगीत दिग्दर्शक गायक यांनी गझल गायनाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडली.


(प्रस्तुत लेखाचे लेखक सुप्रसिद्ध गझल गायक असून ‘स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी गझल गायकीचा उगम आणि आजपर्यंतचा विकास’ ह्या त्यांच्या प्रबंधाला स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी नुकतीच प्राप्त झाली.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: