२७ सप्टेंबर, २००९

दोन गझला : रावसाहेब कुंवर


रावसाहेब कुंवर
९८९०२८०५४०



१.निरगाठ

जगणेच क्षणाचे होते,पण तेच रणाचे होते;
मन मोरपिसाचे माझे अन् घाव घनाचे होते.

मी मजूर मातीमधला,मातीत मिसळणे माझे;
तू तारा लखलखणारा तुज वेड नभाचे होते.

समजू न कधी मज आला दुनियेचा गनिमी कावा;
तलवार कुणाची होती अन् वार कुणाचे होते.

मी एक कफल्लक ऐसा धनवान अचानक झालो;
उपहार तुझ्या नवतीच्या नाजूक धनाचे होते.

या अंधाराशी आहे निरगाठ अशी बसलेली;
त्या सूर्यालाही कारण मग काय भिण्याचे होते.

२.काळजाने

बंद मी आता सुखाला दार केले;
वेदनेला मी मनाचा यार केले.

देह होता घाव सारे सोसण्याला;
तू जिभेला का तरी तलवार केले.

सवय झाली सोस मजला सोसण्याची;
ह्या जगाने हे किती उपकार केले.

सांग ना माझा कसा हा प्राण जावा;
तू फुलांच्या कोयत्याने वार केले.

तू जरी असलीस राणी या धनाची;
मी कुठे तुजला कधी जोहार केले.

का कुणाला जीव लावा काळजाने;
जर पतंगाला दिव्याने ठार केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: