१६ ऑक्टोबर, २०१०

पाच गझला : सुधीर राऊत



प्रा.सुधीर राऊत
_________
९४२२७९२६११

१.सराव

आहे अटारण्यांना भारीच भाव येथे;
बोटावरी तयांच्या नाचे जमाव येथे.

मांडू नको तुझे रे येथे इमान वेड्या;
बाजार चोरट्यांचा कोणी न साव येथे.

गेली खचून आता येथील लोकवस्ती;
धर्मांध राक्षसाचा चालू उठाव येथे.

लागे न आज त्यांना कुठलीच औषधीही;
मेल्यावरीच जाती ऐसे स्वभाव येथे.

माणूस आज चिरडू मुंगी समान आम्ही;
देवास कापण्याचा आम्हा सराव येथे.


२.झरोका

धर्मांध या पिढ्यांची आहे सुरू हमाली;
का तोडण्यास बेड्या कोणी न माय व्याली.

केलाय संप आता रक्तात लेखण्यांनी;
गेली विरून त्यांच्या शब्दांतली खुशाली.

सांगून कृष्ण गेला या अर्जुनास आता;
होऊन तूच शकुनी उलथून टाक चाली.
शेले तयार ठेवा युद्घातल्या विरांनो;
येता प्रसंग बाका होती फितूर ढाली.

शोधावयास गेलो माणूस त्यात जेव्हा;
डोक्यात या पिढीच्या ग्रंथालये निघाली.

अन्याय खूप झाला अंधार कोठडीचा
पाडा असा झरोका येईल सूर्य खाली.


३.कास

टांगून आज जुलमी कवितेस फास आहे;
द्वेषी सिंहासनाचा होणार र्‍हास आता.

लाजे दवात अजुनी प्रतिबिंब पाकळ्यांचे
ह्या झिंगल्या हवेचा चालूच रास आहे.

शहरात सापळ्यांचा बाजार खूप झाला;
रक्तास शोषणारा नेताच डास आहे.

ही थांबवा तयांची आत्ताच घूसखोरी
धोका अखेर त्यांचा भावी पिकास आहे.

रंगून मैफलीला गाऊ नकोस वेड्या;
दु:खी अखेर सगळा श्रोता उदास आहे.

जाळून रोज जाते ही भूक माउलीला;
तोंडात तान्हुल्याच्या नुसतीच कास आहे.

४.सांब

आशेवरी पिकाच्या जगतो अजून मी;
दुष्काळल्या जमीनी फुलतो अजून मी.

पाषाण ठोकळा तू समजू नको मला;
सोसून घाव ताजे घडतो अजून मी.

शोधात नोकरीच्या झिजवीत उंबरे;
पदवीत कागदाच्या कुजतो अजून मी.

पाडू नकोस देवा मोहात रे तुझ्या;
नादात अंतरीच्या रमतो अजून मी.

शेतात योजनांच्या तुम्ही चरा सुखे;
भोळाच सांब बापा फसतो अजून मी.


५. माणसे

भाषणांनी कुण्या नासली माणसे?
माणसांनी कशी कापली माणसे?

सांगती ज्ञान गीता-कुराणे जरी
धर्मवेडी तरी भांडली माणसे?

बांधले राजवाडे दिमाखात पण
पायव्याला किती गाडली माणसे.

नांदली कालची शांततेने पिढी;
आज रक्तात ही नाहली माणसे.

जाळले मारले लोक देशी किती;
ऐकुनी आकडे हापली माणसे.

बांधती-तोडती प्रार्थनांची स्थळे;
देवतांनी कुण्या शापली माणसे.

वाढलो रोज छायेत ज्यांच्या सुखे;
राहिली ना अता आपली माणसे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: