१६ ऑक्टोबर, २०१०

तीन गझला : जयवंत इंगळे



प्रा. डॉ. जयवंत इंगळे
____________
९७६७५२०४८२

१. दीप

वेदनांचा भार मी पेलीत गेलो;
पेटते काळीज सांभाळीत गेलो !

मी दिल्या नाहीत हाका पौर्णिमेला
मी पहाटेलाच धुंडाळीत गेलो.

मागताना भाकरी सारे पळाले;
भाकरीचा चंद्र मी शोधीत गेलो.

राख घरट्यांची इथेही पाहिली मी
काळजाला कोठरे बांधीत गेलो.

वेढला हा देश सारा वादळांनी
एकतेचा दीप मी लावीत गेलो.


२. बाजार

माझियासाठी सुना बाजार होता;
श्वापदासाठी खरा संसार होता.

पेटली होती जरी ही जिंदगानी;
आसवांचा केवढा आधार होता!

ऐकला नाहीस माझा हुंदका तू ?
हुंदका माझाच अब्रूदार होता.

झोपडी पाहून माझी चंद्र गेला;
माझियासाठी असा श्रृंगार होता!

ते म्हणाले 'वाहवा' हासून खोटे;
तो प्रशंसेचा जुना आजार होता.

मी कशासाठी तुझी केली गुलामी ?
हे जगा, तोही जिवाला भार होता.



३. लोक

कंगाल जिंदगीला हासून लोक गेले;
या पांगळ्या मनाला टाकून लोक गेले.

वस्तीत माणसांच्या आता कशास जाऊ ?
रस्त्यात श्वापदांच्या सोडून लोक गेले.

गेलो बुडून सारा माझ्याच आसवांनी;
पाहून आसवांना नाचून लोक गेले.

'आता कसे जगू मी ? ' लोकांस प्रश्न केला;
'सोशीत जा व्यथांना' सांगून लोक गेले.

वाचू कशास गाथा वैराण आसवांची ?
मागेच आसवांना वाचून लोक गेले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: