३१ जुलै, २०११

दो गज जमीन भी न मिली कू -ए-यार मे : डॉ.गणेश गायकवाड 'आगाज'


प्रिय रसिक

तुम्हारा जिक्र गझल है, तुम्हारी बात गझल
हमारे साथ हो तुम तो, हमारे साथ गझल।।
तुम्हारी याद का तकीया सिरहाने रहता है,
हमारे ख्वाब में रहती है, सारी रात गझल।।

ज्यांच्या स्वप्नामध्ये गझल असते, ज्यांना आपल्या कलेशिवाय काही सुचत नाही, कसे कवी शायर कलावंत म्हटले की, आपल्यासमोर प्रतिमा उभी राहते कुण्यातरी कलंदर व्यक्तिमत्वाची ज्याला आपली, जगाची, नातलगांची पर्वा नाही. फक्त गझल, गझल आणि गझल. परंतु उर्दूमधील एखादा जगद् विख्यात शायर मुघल साम्राज्याचा बादशाह असू शकतो, ही गोष्ट अविश्‍वसनीय वाटत असली तरी ती सत्य आहे.
मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशाह 'आखरी मुघल' बहादूरशाह जफर हा कलाप्रेमी, विद्वान, रसिक, गुणीजणांचा चाहता, उत्कृष्ट तलवारपटू होता. परंतु तितकाच हळवा, भावनाप्रधान व शिष्ट दर्जाचा उर्दू शायर होता. याला उर्दूमध्ये 'इज्तमा ए जिद्देन म्हणतात. म्हणजे दोन विरुद्ध गोष्टींचा संगम. उदा.तलवारबाजी करणे आणि शायरी करणे. पहिल्यामध्ये कठोर हृदय लागते तर दुसर्‍यामध्ये हळूवार मन. हा चमत्कार बहादूरशहाने करून दाखविला. बहादूरशहा जफरचे पूर्ण नाव मुहम्मद सिराजुद्दीन बहादूरशहा होते व जफर हे त्यांचे टोपण नाव होते. दुसर्‍या अकबर बादशहाच्या लालबाई या हिंदू बेगमच्या पोटी जफरचा जन्म २४ ऑगस्ट १७७५ मध्ये झाला. लाल किल्ल्यात वाढलेला राजपुत्र पुढे जौक देहलवी या शायराच्या सान्निध्यात आला आणि गझल लिहायला लागला. जॉक राजदरबारातील उस्ताद शायर झाले आणि जफरची शायरी बहरास आली. परंतु म्हटल्याप्रमाणे कदाचित कुठल्याही उत्कृष्ट साहित्याची निर्मिती दु:खात विपन्नावस्थेत, संकटातच होत असावी. बहादूरशहा जफर पुढे दिल्लीच्या तख्ताचे बादशहा झाले आणि ब्रिटीश राजवटीविरुद्ध १८५७ चे बंड सुरू झाले. संपूर्ण भारत पेटून उठला. इंग्रजही तेवढय़ाच ताकदीने बंड चिरडण्याचा प्रयत्न करीत होते. बहादूरशहा जफरसुध्दा बंड करणार्‍या सैन्याचे नेतृत्व करीत होते. इंग्रजांनी बंड मोडून काढले. बहादूरशाहाला अटक झाली. पत्नी मुलांचा शिरच्छेद झाला आणि राजकैदी बहादूरशाहा जफरला ब्रम्हदेशातील रंगून येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आणि निराशेत, वियोगात, दु:खात बहादूरशाहाच्या हृदयातून ही सर्वकालीन गाजलेली महान, प्रसिद्ध गझल बाहेर पडली.

न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ
जो किसी के काम ना आ सके, मै वह एक मुश्ते- ए-गुबार हूँ।।
मेरा रंगरूप उजड गया, मेरा यार मुझसे बिछड गया,
जो चमन खिजा से उजड गया, मै उसकी फसले बहार हूँ।।
प-ए-फातेहा कोई आये क्यूँ , कोई चार फूल चढाये क्यूँ
कोई आके शम्मा जलाये क्यूँ , मै वह बेकसी की मजार हूँ।।

तिसर्‍या शेरामध्ये बादशहा म्हणतो, माझ्या कबरेवर प्रार्थना करायला कुणी यावं, चार फुले कुणी का वहावी, कुणी मेणबत्ती का पेटवावी? मी तर दु:खाचे मूर्तिमंत प्रतीक असलेले समाधीस्थळ आहे. अशा निराशा अवस्थेत बादशहा रंगूनमध्ये दिवस काढत होता. मनामध्ये हिंदुस्थानात जाण्याची ओढ आहे. आपला मृत्यूतरी मायभूमीत व्हावा, ही शेवटची इच्छा गझलमध्येच बादशहाने व्यक्त केली.

लगता नही है दिल मेरा उजडे दयार मे
किसकी बनी है आलमे ना पाईदार में।।
उम्रे दराज मांगकर लाये थे चार दिन
दो आरजू में कट गये, दो इन्तेजार में।।

पहिल्या शेरामध्ये तो म्हणतो, या विरान जागेत माझे मन लागत नाही. हे विश्‍व नाशिवंत आहे. यात कुणाचे बरे झाले म्हणून माझे बरे होणार?दुसर्‍या शेरामध्ये तो म्हणतो, परमेश्‍वराने चार दिवसांचे आयुष्य दिले. त्यातही दोन इच्छा व्यक्त करण्यात गेले अन् दोन वाट पाहण्यात गेले. परंतु शेवटचा शेर त्याचे सर्वात मोठे दु:ख व्यक्त करतो.

कितना है बदनसीब जफर दफन के लिए
दो गज जमीन भी न मिली कू-ए-यार में।

जफर किती दुर्दैवी आहे की, मला पुरण्यासाठी माझ्या प्रियेच्या अंगणात (कु-ए-यार) मध्ये म्हणजे हिंदुस्थानात थोडीशी जागाही मिळू नये.
हेच दु:ख उराशी घेऊन मुघल साम्राज्याचा शेवटचा बादशहा रंगूनमध्येच तुरुंगात १८६२ मध्ये वारला. त्याच्या गझलांची संख्या फार नसली तरी कुल्लीयाते जफरमध्ये २00 गजल असतील आणि त्यामध्ये मानवी दु:ख, विरह, वेदना यांचेच वर्णन आहे.
मुघल साम्राज्याच्या या शेवटच्या बादशाहाची ही शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी सध्याचे उर्दूचे सर्वात मोठे शायर मजफ्फर हनफी यांनी भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना पत्र लिहिले आहे की, रंगूनहून बादशहाची कब्र काढून तिला दिल्लीच्या लाल किल्ल्यातील एका ठिकाणी दफन करावे अन् त्यांची इच्छा पूर्ण करावी आणि त्यावर शेर लिहावा
कितना है खुश नसीब जफर दफन के लिए

दो गज जमीन तो मिली कू-ए-यार में।।

बघू या काय होते, अलविदा!
मो. ९८५0१३५४0५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: