२३ ऑक्टोबर, २०१२

बदीऊज्जमा बिराजदार : तीन गझला




१.

स्वप्ने किती गुलाबी

स्वप्ने किती गुलाबी, सजवून रात गेली;
या फाटक्या जिवाला, फसवून रात गेली.

संमेलने स्मृतींची, आरास वेदनांची;
जळता अतीत माझे, उजळून रात गेली.

मिळते उसंत तेव्हा, शिवतो तमाम जखमा;
एकेक जखम माझी, उसवून रात गेली.

अख्खी सकाळ जाते, मी आवरीत बसलो;
क्षण विस्मृतीतलेही, पसरून रात गेली.

चुकते हरेक व्यक्ती, अपवाद कोण त्याला;
पण बोध त्यातुनी घे, वदवून रात गेली.

करतोस केवढी तू चिंता उगा उद्याची;
झोपेविनाच "साबिर" उलटून रात गेली.

२.

प्रेतास चूड नुसती

प्रेतास चूड नुसती लावून लोक गेले;
कर्तव्य पार त्यांचे पाडून लोक गेले.

भुरटेच चोर आता होवून साव आले;
त्यांची चुणूक मजला दावून लोक गेले.

केले न माफ माझ्या प्रेतासही जगाने;
टाळूवरील लोणी खाऊन लोक गेले.

माझ्यासमान नव्हता कोणीच कानफाटा;
आरोप नेहमीचे ठेवून लोक गेले.

रेंगाळला परंतू, ना थांबलाच “साबिर”;
दारास काल टाळा ठोकून लोक गेले.

३.

शब्द झाले दागिने

शब्द झाले दागिने, शृंगारली माझी गझल;
मैफिलींमध्ये पहा संचारली माझी गझल.

का मुखवट्यांनाच मानू लागलो मी चेहरे?
वाचताना चेहरे अंधारली माझी गझल.

शुष्क झाली माणसे अन् कोरड्या झाल्या दिशा;
याच दृष्याने किती ओसाडली माझी गझल.

पाहिले अश्रू, कधी तर, ऎकले मी हुंदके;
ते टिपायाला पुढे झेपावली माझी गझल.

कागदी गझला परंतू बोलबाला केवढा!
सांगतो इतकेच की, बेजारली माझी गझल.

पैंजणे घालून माझी गझल नाचू लागली;
तोच त्यांनी का अशी धुत्कारली माझी गझल?

स्वप्न गझलेचे पहाता प्राण “साबिर” सोडला;
ते समाधी बांधता, साकारली माझी गझल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: