२३ ऑक्टोबर, २०१२

मसूद पटेल : तीन गझला




१.

मोसम

पाहून मोसमाची बेमान रीत आता;
विसरून पार गेलो पाऊस गीत आता.

व्यवहार पोसणार्‍या शहरात एक वेडा;
फिरतोय शोधण्या बघ निर्व्याज प्रीत आता.

जगण्यात रोज मेली ही जिंदगी अशी की
मरणास ही खर्‍या मी नांहीच भीत आता.

सुख एक दूर जाता आली अनेक दुखे:
माझ्या सवे रहाया या झोपडीत आता.

आजन्म ओढ होती ज्याची तुला उन्हा रे;
उरला न गारवा तो या सावलीत आता.

अडवू नको किनार्‍या तू वाट आज माझी;
घेण्यास मी निघालो वादळ मिठीत आता.

२.

विसावा

या तुच्छ जीवनाला इतकाच वर मिळावा;
सेवेत शोषितांच्या बस देह हा झिजावा.

निर्व्याज ती नजर दे डोळ्यास मज अशी की
भगवा, निळा नि हिरवा मज सारखा दिसावा.

जग दूरचे खरोखर दारी जरूर आले;
पण आपसी दुरावा केव्हां इथे मिटावा?

वस्ती गरीब कोणी जर जाळलीच नाहीं;
मग धूर सारखा हा तेथून कां निघावा?

जमलेत आप्त सारे छळन्या मला इथेही;
सरणावरी जरा मी जो घेतला विसावा.

३.

शेवटी-शेवटी

हट्ट सोडून दे शेवटी शेवटी;
नाखुशीनेच ये शेवटी शेवटी.

पोळल्यावर सखे दुष्ट शहरी तुझ्या;
गाव मज आठवे शेवटी शेवटी.

अंतरी नेमका मीच होतो तुझ्या;
तू जरी जाणले शेवटी शेवटी.

दावण्या या जगी मी खरा चेहरा;
मुखवटे काढले शेवटी शेवटी.

जिंकुनी वादळे मी बुडालो खरा;
या किनारी गडे शेवटी शेवटी.

पाहुनी रूप मी या जगाचे खरे;
तत्व गुंडाळले शेवटी शेवटी.

बोलणे सत्य माझे सदा जीवनी;
यार ठरले गुन्हे शेवटी शेवटी.

या प्रवासात मज सोबती राहिले;
फक्त रस्तेच हे शेवटी शेवटी.

लोक आतूर असता गझल ऐकण्या;
संपले शब्द हे शेवटी शेवटी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: