सीमोल्लंघन १० लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सीमोल्लंघन १० लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

११ नोव्हेंबर, २०१०

*गझलकार* ॥ सीमोल्लंघन २०१०॥




ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त उर्दू शायर शहरयार यांना सादर समर्पित
*गझलकार*
॥ सीमोल्लंघन २०१०॥


                 अंतरंग




**********************************************
‘गझलकार’ सीमोल्लंघन १०

लेख :




दोन मुलाखती:




गझला:















**********************************************


























१७ ऑक्टोबर, २०१०

श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांमधील स्त्रीजाणीव : श्रद्धा पाटील


श्रीकृष्ण राऊत हे गझलसम्राट सुरेश भट यांच्या नंतर त्यांच्या तख्तावर हक्क सांगू शकेल असे नाव़ त्यांचा गुलाल आणि इतर गझला' हा संग्रह लोकप्रिय झाला आहे़ त्यातील काही गझला संगीतबद्धही झालेल्या आहेत़ प्रस्तुत संग्रहात व कवीच्या इतर असंग्रहित गझलांमध्ये प्रकटलेली स्त्रीजाणीव हा या लेखाचा विषय आणि मर्यादा़
श्रीकृष्ण राऊतांच्या गुलाल आणि इतर गझला' या संग्रहातील ६९ गझला आणि असंग्रहित १६ गझला मिळून एकूण ८५ गझला प्रकाशित झालेल्या आहेत़ त्यातील बहूतांश गझलांमध्ये स्त्रीजाणीव व्यक्त झालेली आहे़ प्रीतीच्या विभिन्न छटा आणि स्त्री जीवनातील व्यथा असा दुपदरी स्त्रीजाणीवेचा गोफ प्रस्तुत गझलांमध्ये गुंफलेला आहे़

स्त्री-पुरूषांमध्ये एक आदिम नातं आहे़ निसर्गतःच असलेल्या परस्पर आकर्षणातून ते निर्माण झालय़ समाज' म्हणून काही आस्तत्वात येण्यापूर्वी पासून ते येथे फूललय, बहरलय, त्याचे नाव प्रीत़ प्रेमात पडल्यावर माणसाला काव्य स्फुरते की काव्यच त्याला प्रीती शिकविते कोण जाणे परंतु प्रेमकविता लिहिली नाही असा कवी दुर्मिऴ श्रीकृष्ण राऊतांच्या अनेक गझलांमधून प्रीतीभावनेचा आविष्कार झालेला आहे़ नुकत्याच प्रेमात पडलेल्या प्रेमवीरापासून तर प्रगल्भ प्रियकरापर्यंत व प्रेमातील बेहोशी पासून तर प्रेमभंगातील उदासी पर्यंत विविध भावभावनांचे तरंग प्रस्तुत गझलांमधून उमटले आहेत़ यात प्रीतीच्या चढत्या प्रवासा सोबतच कवीच्या वाढत्या विकासाच्या पाऊलखुणाही स्पष्टपणे चिन्हांकित झालेल्या आहेत़

प्रेमात पडलेल्या माणसाला आपल्या प्रेयसी एवढे सुंदर काहीच वाटत नाही़ तिची तुलना तो चंद्र तार्‍यांशीच करणाऱ त्याची दृष्टी जमिनीवर असतेच कुठे ? आणि येते तेव्हा गुलाबांच्या ताटव्यावर विसावते़ चंद्र-चांदणे, चांदण्या यांचा मराठी काव्यातील वापर मराठी काव्याच्या जन्माइतका प्राचीन आहे़ त्याहीपूर्वीच्या संस्कृत काव्याशी नाते सांगतील अशा या प्रतिमा आहेत़
लाजली पोर्णिमा, लोपला चंद्रमा;
चांदण्यांनी तुझा चेहरा पाहिला़'
गर्व त्या हारल्या, सर्व त्या भाळल्या;
अप्सरांनी तुझा चेहरा पाहिला !'
अगदी देवही फसतो आणि देवता मत्सराने पेटतात असे वर्णन कवीने केलेले आहे़ प्रेयसीच्या रूपवर्णनात आतशयोक्ती अलंकाराचा वापर ही प्रेमाची प्राथमिक अवस्था आहे की कवीची ?

गौरवर्ण, गुलाबी गाल, मधाळ ओठ, चेहर्‍यावर रुळणार्‍या केसांच्या बटा, गालावरची खळी, काळा तीळ, चंद्र फिका पडेल असे सौंदर्य, ही सौंदर्याची एक पारंपरिक चौकटच साहित्यात निर्माण झालेली आहे़ मराठी साहित्यातील कथा, कादंबर्‍या, कविता पैकी कोणताही वाङ्मय प्रकार उघडावा ही सौंदर्यस्थळे जागोजागी दृष्टीस पडतील़ पूर्वसुरींचा प्रभाव म्हणा किंवा प्रेमाचा स्वभाव पण प्रस्तुत गझलांमध्ये ही सौंदर्यस्थळे आढळतात़




गालावरी कळ्यांना उमलून रूप आले;
हा ताटवा गुलाबी वाटे तयार झाला़'


माझिया ऐवजी ओठ ज्या चुंबिती;
त्या बटांना गडे दूर सारू नको़

गोर्‍या तुक्या रूपाने भलती कमाल केली;
बघण्यास आरशाला दृष्टी बहाल केली़'

परंतु कवी लवकरच या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडतो़ इतकेच नव्हे तर या चौकटीला आपल्या कल्पकतेचे रंग चढवून नाविन्य बहाल करतो़ परंपरा आणि नवता यांचा सुरेख समन्वय काही गझलांमध्ये साधलेला आहे़ गावरान गुलाबावर केलेले बडिंग जोमाने बहरावे तशा या गझला बहरल्या आहेत़

तुझ्या गुलाबी ओठांवरती गीत लिहावे ओठांनी;
चंद्र असावा मिठीत अन्‌ धुंदीत रहावे ओठांनी़'
हळूच हसता लख्ख चांदणे अंगावरती बरसावे़
गालावरच्या खळीत तेव्हा सहद टिपावे ओठांनी़'

कोणत्याही काळात कोणत्याही स्थळावरून आणि कितीही वेळा चंद्र-चांदणे पाहिले तरी ते मोहकच वाटणार तशा ह्या गझला मोहकच वाटतात़

पारंपरिक प्रतिमांना नवीन आशय वलय प्रदान करण्यात कवी यशस्वी झालेला आहे़ तशाच अनेक नाविन्यपूर्ण प्रतिमा ही त्यांनी समर्थपणे साकारल्यात़ काही ठिकाणी सूचकतेने सौंदर्य आधक खुलले आहे़

टंच ओठी तुक्या हे मधाचे झरे;
श्वास होण्या तुझा रोज वारा झुरे़'

सांगू कशी फुलाचा देठास भार झाला;
हा बहर यौवनाचा देहास फार झाला़'
प्रस्तुत गझलांमध्ये प्रेमभावनेचा वसंत पानोपानी बहरलाय तशीच प्रेमभंगातील शिशिराची पानगळ ही दृष्टीस पडते़ प्रेमसाफल्यामुळे उचंबळून जाणारी भाववृत्ती व प्रेमभंगाच्या नैराश्याने उन्मळून पडलेली मनोवृत्ती कवीने सारख्याच उत्कटतेने चितारलेली आहे़ सर्व गझला पाहता जाणवते की या गझलांमधील प्रीतीभावना ही प्रेयसीविषयीची आहे़ पत्नीविषयक प्रेमभावना यात नाही़ प्रेमाची नव्हाळी, आर्तता, मीलन, प्रेमभंग, सावरणे अशी चढती, उतरती भावनिक आंदोलने यात चित्रित झालेली आहेत़
ना झोपतो, ना जागतो, मी वागतो वेड्यापरी;
तंद्रीत एका वेगळ्या मी राहतो वेड्यापरी़'

तुह्या मुचूक जगणं वाटे जह्यराची पुडी;
तुह्या संगच मरावं माह्या जिवाले वाटते़'

जे काय पाहिले ते ठाऊक फक्त त्याला;
शेजेसमोर होता जो आरसा बिलोरी़'
अशी प्रीत दिवसागणिक भराला येते़
फूल ज्वालांवरी झोपले जे
नाव त्याचेच का प्रीत आहे ?'

सुकुमार काळजाचा पेटेल रोज वणवा;
होईल राख तेव्हा माझी तुझी कहाणी़'
यासारख्या काही गझलांमधून भग्नहृदयाचा टाहो ऐकावयास येतो़
कवीने काही ठिकाणी शारीर पातळीवरील प्रेमभाव चितारलेला आहे़ परंतु तो अशा कौशल्याने चित्रित केलेला आहे की कुठेही अश्र्लीलता जाणवणार नाही़

स्पर्श सांगती स्पर्शांना अन्‌ डोळे वदती डोळ्यांना;
अशा घडीला मूक राहुनी फक्त पहावे ओठांनी़'
प्रस्तुत गझलांमध्ये कवीची पत्नीविषयक प्रेमभावना कुठे आभव्यक्त झाली नसली तरी़ डॉ़बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील वंदना' या गझलेमध्ये बाबासाहेबांचे त्यांच्या पत्नीवरील प्रेम कवीने समर्थपणे आभव्यक्त केले आहे़

इथे दूर देशी मला आच लागे;
उभे दुःख तेथे तिला जाळण्याला़'

तिच्या काळजीने कधी खिन्न होतो;
परी वेळ नाही मला थांबण्याला़'

कविवर्य कुसुमाग्रजांच्या काव्यातील देशभक्ती पोटी आपल्या प्रीतीभावनेला दूर सारणार्‍या प्रेमिकाची(पतीची) आठवण देईल अशी ही गझल आहे़

पारंपरिक सौंदर्याच्या कवीकल्पनांहून सर्वस्वी वेगळे असे प्रेयसीचे वर्णन काही गझलांमध्ये आहे़ कवीची प्रेयसी रूपवती नाही तर गुणवती आहे़ रूपापेक्षाही गुणांचे मोल जाणणारी प्रीतीभावना ही आधक परिपक्वता दर्शविणारी आहे़ प्रीती सोबतच कवीच्या स्त्रीजाणीवेतील परिपक्वताही यात प्रतिबिंबित झाली आहे़

एक पोटामधे एक ओठावरी;
चांगली यापरी सावळी सावळी़'
मोकळे बोलणे, हासणे मोकळे;
पारदर्शी प्रिये तू जळासारखी़'

अनुभवातून आलेल्या प्रगल्भतेने प्रीतीविषयक तत्त्वज्ञान कवी मांडतो़

समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते;
मीपण अवघे किंमत भारी प्रेम मागते़'

रांगोळी जर नकार दे;
रंग गुलाबी भरू नको़'

शाहीर अनंतफंदी' च्या फटक्यात शोभेल असा हा शेर आहे़

कवीची ‘मी गेल्यावर' ही गझल नारायण सुर्वेंच्या तेव्हा एक कर' कवितेची आठवण देणारी आहे़ उदात्त प्रीतीभावना त्यात साकारलेली आहे़
जाळ आपल्या पत्रांना त्या जुन्यापुराण्या;
लिहू लाग तू मजकूर नवे मी गेल्यावऱ'


प्रतिमा, प्रतिके यासारखाच काव्यातील एक महत्त्वपूर्ण गुण म्हणजे प्राक्कथा़ एखाद्या कथेएवढा आशय एका ओळीत सांगण्याचे सामर्थ्य एका प्राक्कथेत असते़ परंतु त्याचा ताकदीने वापर करण्यासाठी कवीकडे तेवढे प्रतिभा सामर्थ्य असावे लागते़ मर्ढेकर व सुरेश भट यांच्या एवढ्या ताकदीने प्राक्कथांचा वापर करण्याची हातोटी श्रीकृष्ण राऊतांना साधलेली आहे़
परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;
मला सांगू नको रामा, तुझा वनवास थोडासा़'

शेजेवरती सांगे ताबा घरी रूक्मिणी;
कोणी वेडी मीरा दारी प्रेम मागते़'

राज्यात कोतवाली त्यालाच लाभते;
लाचेत देत आहे जो लेक भामटा़'
प्रस्तुत गझलांमध्ये शब्दाच्या वार्‍यानेही आशयाचा सुगंध उडून जाईल इतका तरल भाव काही ठिकाणी विसावलेला आहे़

शृंगारल्या उन्हाने मजला विकार झाला़

झंकार स्पंदनांचा तर बेसुमार झाला़
आषाढ यौवनाचा जर जाणकार झाला़
पापण्यापल्याडची झेलता व्यथाफुले़
शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे़
चंद्राविणा नभाच्या रूसतील हाय रात्री़
वाटली तू सूगंधी फुलांची कधी;
अन्‌ कधी तू उन्हाच्या झळासारखी़
तू मौन घेतले पण, हे बोलती शहारे़

प्राजक्ताचा सडा डोळे भरून न्याहाळावा आणि त्याचा हळुवार सुगंध तनामनात साठवावा़ पण त्या नाजूक कोमल फुलाला आपल्या राकट हाताने स्पर्श करू नये; तशा या प्रतिमा़ त्यातील प्रसन्नतेची छाया आपल्या मनाच्या कुपीत जपून ठेवावी़

कवीला स्त्री व्यथेची जाण आणि सामाजिक जाणीवेचे भान आहे़ कवीची स्त्रीजाणीव केवळ प्रीतीभावनेत बेधुंद होणारी नाही़ तर तिचे नाते मानवतेशी, समतेशी आहे़ म्हणूनच पुरुषप्रधान संस्कृतीतील विषमतेने कवी विषण्ण होतो़ मुलीचा गर्भ पाडणे, दुय्यम दर्जा, बलात्कार, विक्री, सासुरवास, हुंडाबळी अशा स्त्रियांच्या व्यथा औपरोधिक आवेशाने कवीने मांडल्या आहेत़ स्वातंत्र्य, समता आणि न्याय यापासून स्त्री आजही वंचित आहे़ हे सामाजवास्तव अधोरेखित करताना कवीची केवळ सहृदयताच नाही तर उद्विग्नतेतून प्रकटलेली चीड ही दिसते़
नव्या या उंबर्‍यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे;
कुणी हे लावले आहे इथे रॉकेल मापाला ?'
देतोस थोरली तू की धाकटीस नेऊ;
हा कर्ज फेडण्याचा साधा उपाव आहे़'
यांच्या करामतींना नाही अशक्य काही;
पोरीस अर्धकच्च्या आणेल न्हाण वस्ती़'
वाचणार्‍याच्या काळजात चर्र होईल इतक्या प्रभावीपणे येथील भीषण सामाजिक वास्तव कवीने शब्दबद्ध केले आहे़ एक अंतर्मुख करणारा प्रश्न कवी विचारतो-
कशी कळेना अजून आहे इथे वडांची सुरूच पुजा;
जिथे कधीही नवीनवेली उभ्याउभ्याने जळून जाते़'

मऊ मेणाहून आम्ही विष्णूदास। कठीण वज्रास भेदू ऐसे॥ तुकोबांच्या या उक्तीमध्ये आलेले मेणाहून मऊपण व वज्राहूनही काठिन्य असे परस्पर विरोधी भाव राऊतांच्या गझलांमध्ये समर्थपणे प्रकटलेले आहे़ प्रीतीभावनेतील कोमल भाव ज्या तरलतेने कवी मांडतो तितक्याच उपरोधपूर्ण आवेशाने अन्यायावर तुटून पडतो़

स्पर्शात मोर आले, अंगांग फूल झाले;
नाजूक पाकळ्यांचा फुलतो हळू पिसारा़'

टिळे लावून रक्ताचे, भरा ओट्या निखार्‍यांनी;
कुणी घासात निर्दोषी जरा पोटॅश' ही घाला़'

प्रस्तुत गझलांमध्ये स्त्री जाणीवेच्या अनुशंगाने आलेल्या एकूण १७ गझला या मुसल्सल गझल' प्रकारात मोडणार्‍या आहेत़(एकच विषय उलगडत नेणार्‍या गझलेल्या उर्दूत मुसल्सल गझल' म्हणतात़) त्यापैकी कोळसा' ही एकमेव मुसल्सल गझल' स्त्रियांवरील अन्यायाचा परखड शब्दात निषेध करणारी आहे़ उर्वरित १६ ग्ाझलांमध्ये प्रीतीभावना व्यक्त झाली आहे़ इतर गझलांमध्येही स्त्रीव्यथेचा उद्गार उमटलेले शेर' अल्प प्रमाणात आहेत़ स्त्री समस्येची जाण, चिंतनशीलता, संवेदनशीलता, धारदार उपरोध प्रकट करण्याचे सामर्थ्य, अन्यायाची चीड हे सर्व आभव्यक्त करण्यासाठी नवीन प्रतिमा निर्माण करणारी प्रतिभा (उदा़ उंबर्‍यावर रॉकेल मापाला लावणे, कुंकातील लाली कपाळाला डसणे) राऊतांकडे असूनही त्यांची लेखनी प्रीती भावनेभोवतीच रुंजी घालताना दिसते़ भ्रमर जसा कमलपुष्पात अडकून पडतो तसा कवी प्रेमपुष्पात गुंतून पडलेला आहे़
उपरोक्त निष्कर्ष हा श्रीकृष्ण राऊतांची स्त्रीजाणीव ह्या विषय मर्यादेच्या अनुशंगाने काढलेला आहे़ अन्यथा प्रस्तुत संग्रहात सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या विषयावर भाष्य करणार्‍या गझलांची संख्याही लक्षणीय आहे़ एकंदरीत श्रीकृष्ण राऊतांच्या गझला आतशय दर्जेदार आहेत़ अनेक मान्यवर साहित्यिकांनी गुलाल आणि इतर गझला' या संग्रहास वाखाणलेले आहे़ कवीचा गझलांचा व्यासंग, विभिन्न गझलवृत्तांचा समर्थ वापर, छंदावरील प्रभृत्व, आशयसंपन्नता इ़अनेक गुणांनी हा संग्रह परिपूर्ण असून मराठी गझलेच्या प्रांतात कवीला अढळ स्थानावर विराजमान करण्याएवढ्या ताकदीचा आहे़

________________________________________
प्रा़श्रद्धा पाटील
श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला
मो. ९८२२८५६१४५

उर्दू गजल गायनातील एक मराठी माणूस : मदन काजळे



मदनजी आपण मराठी भाषिक असूनही उत्कृष्ट उर्दू गजल गाता व त्यात आपण आपला ठसा उमटविला आहे, तर आपले पूर्ण नाव काय ?

माझे नाव मदन नागोराव काजळे.

आपली जन्म तारीख आणि जन्म ठिकाण कुठले ?

आपल्या घरी गाण्याचा वारसा आहे का ?

तसे म्हणाल तर असा वारसा नव्हताच पण माझ्या आईचा आवाज गोड होता. ती येता-जाता, शेतात काम करता गाणे गुणगुणायची. तिला हा वारसा तिच्या वडलांकडून मिळालेला होता.

आपला पूर्वापार व्यवसाय ?

आम्ही शेतकरी. माझे आई - वडिल शेतकरी. मी त्यांचे एकुलते एक अपत्य. अ सणाज्या शेतीत शेतीत आम्ही काम करीत असू पण त्यातून संसार चालविणे कठीण होते. त्यामुळे 12 पर्यंत पुसद येथे शिक्षण घेतल्यावर आम्ही गावची शेती विकून अकोल्याला स्थायिक झालो.

आपले शिक्षण कुठपर्यंत झाले ?

मी अकोल्यात राहून माझे पुढील कला शाखेतील पदवीपर्यतचे शिक्षण घेतले.

गायनाची आवड केव्हापासून व त्याचे रीतसर शिक्षण कधी घेतले ?

माझ्या आईचा आवाज गोड होता व तिला गाणे गुणगुणण्याची हौस होती ते मघाशी मी म्हणालो आहे. त्याचा परिणाम बालपणापासून माझ्यावर पडला. पण गाणे मात्र कधी गायलो नाही. गावातील भजन मंडळात मात्र जाणे असायचे.
गायनाच्या शिक्षणाबाबत सांगायचे झाले तर माझे रीतसर असे शिक्षण खूपच उशिरा म्हणजे कला शाखेच्या पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना झाले. नामवंत शास्त्रीय संगीत - गायक श्री. अनिरूध्द खरे यांच्याकडे सुरू झाले. त्यांनी माझी परीक्षा घेतली आणि त्यांची खात्री पटली की एवढ्या उशिरा सुरवात केल्यावरही हा तरूण काहीतरी चांगले करून दाखवील. त्यानुसार त्यांनी माझ्यावर मेहनत घ्यायला सुरवात केली.
एकीकडे माझे महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते व दुसरीकडे शास्त्रीय संगीताचे धडे. माझ्या या तरूण वयात मी यावर खूप मेहनत घेतली. त्या काळी अप्रूप असणाज्या सिनेमालाही मी जायचो नाही. कारण तिथे जाऊन घालविल्या जाणाज्या तीन तासांऐवजी मी रियाज करीन. मी या कलेला संपूर्णतया वाहून घेतले होते.

शास्त्रीय गायन शिकत असतांना गझल गायनाकडे कसे वळलात ?

गुरूजींकडे गाण्याचे शिक्षण सुरू होते. पण त्याच वेळी महाराष्ट्रातील सुप्रसिध्द हार्मोनियमवादक, संगीत तज्ज्ञ श्री. सुधाकर आंबुसकर यांच्या संपर्कात मी आलो. त्यांनी मला याबाबत खुपच महत्वाचे आणि उपयुक्त असे मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून सुगम संगीत - भावगीत, भक्तीगीत, गजल गायन याबाबत अनेक प्रेरक गोष्टी ऐकल्या. त्यातूनच मला गजल गायनाची ऊर्मी झाली.

आपण मिरज-सांगली येथील अखिल भारतीय गांधर्व महामंडळाची गायन विशारद ही परीक्षा उत्तम रीत्या उतीर्ण झाला आहे . ते शिक्षण कोणाकडून घेतलेत ?

आदरणीय श्री. बाबासाहेब देशपांडे हे नागपुर येथील मॉरीस महाविद्यालयातुन संगीत विभागप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे मुळचे गाव दिग्रस. माझे मामा तेथे असत. मामांकडे गेल्यावर त्यांच्याकडे जाणे येणे सुरू झाले त्यांनी माझी तयारी पाहून विशारदसाठी शिक्षण देण्याची संमती दर्शविली.
हे गायन शिक्षण घेत असतांना मी त्यांच्या घरी 12-12 किलोमीटर पायी चालत जायचो - यायचो. कारण त्यांच्याकडे जाण्यासाठी माझ्या आडगावातून एस. टी. नव्हती.
वर्षभर माझी पायपीट पाहून एक सद्गृहस्थ माझ्या मदतीला धावून आले. त्यांचे नाव शंकरराव सोनटक्के. ते पाटबंधारे खात्यात वरिष्ठ लिपिक म्हणून दिग्रसला कार्यरत होते. गाणे शिकण्याची माझी जिद्द व त्यासाठी मी घेत असलेले कष्ट हे पाहून त्यांनी जुजबी ओळखीवर मला त्यांच्याकडे ठेवून घेतले. त्यांच्याकडे राहून मी गुरूजींकडे गाणे शिकू लागलो.

_________________________________________________________

मदनजींच्या स्वरात ऐका : डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची गझल :


तुझ्या हासण्याचे दिवाणे किती

____________________________________________________


हा नित्यक्रम पुढे तसाच चालू राहिला का ?

वर्षभर श्री. सोनटक्केच्या घरी मी राहिलो. पण नंतर त्यांची बदली पुसद येथे झाली. आता माझ्यापुढे मोठे संकट उभे राहिले. गावाकडून यायचे तर खुप त्रास व शिक्षण अर्धवट सोडावे तर आतापर्यंत उपसलेल्या कष्टावर पाणी फेरण्यासारखे होते. पण म्हणतात ना प्रबळ इच्छा असणाज्याला मदत मिळतच असते. यावेळी पुन्हा श्री. सोनटक्केच माझ्या मदतीला धावून आले व त्यांनी मला पुसदला एक खोली बघून दिली व तिथे राहून मी गुरू जीकडे शिक्षण घेऊ शकलो.त्यांनी नुसती खोली दिली नसून भोजनाची इतकेच नव्हे तर पुसदपासून दिग्रसपर्यंत जाण्या-येण्याचा खर्च ते करायचे.तेथेच मी त्यांच्या दुसज्या इयत्तेत असणाज्या मुलीला सारिकाला गायन शिकवू लागलो जी आज परतवाडा येथे संगीत प्राध्यापीका म्हणून काम करीत आहे.
बाबासाहेब देशपांडे यांच्याकडे शिक्षण घेत असतांना गजल, भजन, गीत अशा प्रकारचे काही जाहीर कार्यक्रम केले.

या उर्दू गजल होत्या का ?

होय, विदर्भात यासाठी चांगला माहौल आहे आणि मी देखील फक्त उर्दूचाच विचार केला होता.

मग शायरांशी तुमचा परिचय कसा झाला ?

एकदा पुसद येथे उर्दूतील दिग्गज शायर कैसर-उल-जाफरी हे मुशायज्यासाठी आले होते. मी त्यांची भेट घेतली. त्यांनी मला व्हिजींटिंग कार्ड दिले व मुंबईस आल्यावर भेटण्यास सांगितले.
पुढे मी पुसदहून अकोल्याला आलो. माझे लग्न झाले माझी पत्नी वनिता हिला गाण्याची आवड आहे. अकोल्यात असतांना नम्रता व निलांबरी या दोन मुलांचा जन्म झाला. त्यानंतर मी सन 1998 च्या सुमारास मुंबईस आलो.

मुंबईत आपला जीवन प्रवास कसा सुरू झाला ?

मी कला पदवी व गायनातील विशारद पदवी व पदरचे गाणे शिकून मुंबईस स्थायिक होण्यासाठी आलो होतो. शास्त्रीय गायन शिकलो होतो पण ओढ मात्र उर्दू गजल गायनाकडे होती. यासाठी प्रथम मी उर्दूतील शायरांची गाठीभेटी घेऊ लागलो. मुशायज्यांना, गजल गायन कार्यक्रमांना हजेरी लावू लागलो. आता पध्दतशीरपणे उर्दू गजल, त्यातील शब्दांचे उच्चार, भावर्थातील नाजूक- तरलपणा, लक्षात येऊ लागला होता. आणि आपण ज्या कामासाठी मुंबईला आलो आहोत - त्या उर्दू गजल गायनाचे आपले उद्दिष्ट पुर्ण करू असा मनोमन विश्वास बाणवला.

आपली याबाबत धडपड कशी सुरू झाली ?

पहिल्यांदा मी कैसर-उल-जाफरी साहेबांना भेटलो. त्यासाठी ते व्हिजिटिंग कार्ड कामी आले. त्यांनी माझे आनंदाने स्वागत केले. त्यांनी माझी कलाकारी जाणून घेतली. माझा आवाज आणि सादरीकरण करण्याची शैली पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी याबाबत काही मौलीक सूचना केल्या व उर्दू शब्दांच्या उच्चाराबाबत आणखी तयारी करण्याचे जाणून घेण्याचे फर्मावले.
त्यानुसार मी वेगवेगळ्या शायरांना भेटण्याचा, त्यांच्या गजला ऐकून घेण्याचा, उच्चारातील दोष कसा घालवावा व अचुक शब्दफेक कशी करावी याचे मार्गदर्शन घेऊ लागलो व त्यासाठी मी उर्दू मुळापासून शिकायला सुरवात केली.
कैसर-उल-जाफर साहेबांनीच मला बज्याच शायरांची ओळख करून दिली. मग मी शकील आजमी, अबू-हमीर आजमी, एच.के.राजदान, इब्राहिम अश्क, मुमताज राशीद आदी शायरांच्या सहवासात राहून उर्दू गजल लेखन-गायनाचा अभ्यास करू लागलो व आजही करत आहे. त्याचा फायदा मला माझ्या कलेत होत आहे.

आपण उर्दू गजलगायनातील एक सुप्रसिध्द गायक आहात. आपल्या सगळ्या मैफिली उर्दू संस्था-कॉलेज यांमध्ये झाल्यात. तिथे कधी तुम्हाला उणेपणा जाणवला का ?

सर्वसामान्यपणे कला पेश करतांना येणारे दडपण सुरवातीस माझ्यावरही होते. पण हळूहळू स्थिरावल्यावर मात्र मी मागे वळून पाहिले नाही. अर्थात हे दडपण कलेतील उणिवांबद्दल नव्हते जर केवळ नवखेपणाबद्दलचे होतेध्.

आपल्या मैफिली कुठे कुठे झाल्यात ?

सुरवातीस विदर्भात - त्यानंतर मुंबई व आजूबाजूचा परिसर तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व दिल्ली आदी राज्यांमधुन माझ्या गायनाचे कार्यक्रम झाले. यात कधी संस्था, कधी महाविद्यालये तर कधी क्लब्जमधूलही माझ्या मैफिली होत असतात.

आपणास लाभलेल्या श्रोतृवर्गाबद्दल काय सांगता येईल ?

मला नेहमीच चांगला श्रोतृवर्ग लाभला. इतकचं काय बज्याच वेळा त्यांना नंतर नावावरून कळले की हा बिगर उर्दू भाषिक आहे. ते मनापासून माझ्या गायनात समरस होतात. त्यातील कित्येक दर्दी मला मैफिलीनंतर भेटत असतात. नुकत्याच पोलीस जिमखान्यात झालेल्या मैफिलीत - तेथील पोलीस अधिकारी व त्यांचे सहायक खूपच खुश झाले. पण गजलच्या बाबतीत मात्र मला विदर्भातील श्रोतृवर्ग अधिक परिपक्व वाटला.

आपला पुर्ण वेळ व्यवसाय गजल गायन आहे ?

होय, मी सुरवातीस मुंबईस आल्यावर चरितार्थासाठी नोकरी करणे भाग होते म्हणून मी कांदिवली येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे तीन वर्ष संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली. पण केवळ नोकरी करण्यासाठी मी मुंबईस आलो नाही, याची जाण ठेवून मी आता गायनाचे जाहीर कार्यक्रम व गायनाचे शास्त्रीय तसेच सुगम संगीताचे शिक्षण देत आहे.

आपले आवडते गायक कोणते ?

उस्ताद गुलाम अली, मेहंदी हसन साहेब, हरिहरन, चंदनदास,रूपकुमार राठौड, जगजित सिंग आदी.
मराठीतील भीमराव पांचाळे, सुरेश वाडकर हे गायक आवडतात.

आपण मराठी भाषिक आहात आणि उर्दू गजला तितक्याच ताकदीने पेश करता, पण आपण मराठी गजल गायल्या का ?

होय तसा योग उशिराच आला.माझे स्नेही सुधाकर आंबुसकर यांनी अमरावतीचे गजल जाणकार नानाभाऊ लोडम यांच्याशी माझी ओळख करून दिली. अमरावती येथे त्यांनी सुरेश भटांच्या जयंती उत्सवात कार्यक्रम करण्याची संधी दिली व तिथे मी प्रथमत: इलाही जमादार यांची मराठी गजल गायलो.
त्यानंतर सांगली, वाई आदी ठिकाणी झालेल्या मैफिलीत मी दिलीप पांढरपट्टे, आप्पा ठाकूर, संदिप माळवी आदी गजलकारांच्या गजला गायल्या आहेत व यापुढे मराठी गजल गायन कार्यक्रम करण्याचा माझा मनोदय आहे.

आपला पहिला सीडी अल्बम उर्दू गझलांचा येतो आहे ना ?

हो, मुख्यत: आपल्या सहकार्याने व परिश्रमाने मी संगीत दिलेल्या व गायलेलया उर्दू गजलांचा एक अल्बम लवकरच येत आहे. त्यात राजेश रेड्डी, मुमताज राशीद, अबु हमीर आजमी, एच के राजदान आदी शायरांच्या गजला आहेत.
तसेच युनिव्हर्सल कंपनीकडून मी संगीत दिलेल्या गीत व गजलांचा दुसरा अल्बमही येत आहे. त्यात देवकी पंडित आणि सुरेश वाडकर यांचा आवाज आहे.

गायन अंगभुत असावे असे तुमचे मत आहे का ?

होय, गायन नुसते अंगात नव्हे तर रक्तात असावे असे मला वाटते. एखादा जोरजुलमाने गायन शिकू शकतो - त्यातील परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकतो पण तो गाण्याला न्याय देऊ शकत नाही. म्हणून गायण शिकणाज्याने आपल्यातील गुण ओळखून अपार मेहनत करायला हवी कारण गायन जसे वरदान असावे लागते तसे क्षणाक्षणाला शिकणे असते. परिश्रम घेण्याची वृत्ती असेल तरच तो गायक - कलाकार आयुष्यभरासाठी टिकून राहू शकतो. अन्यथा लवकरच यातून गाशा गुंडाळावा लागतो. त्यामुळे शेवटी कलेचीच हानी होत असतेध्.

आपण उशिरा गाणे शिकलात, त्यातही दुसज्या भाषेतील कार्यक्रम सादर करू लागतात आणि त्यात यशस्वीही झालात - या संपुर्ण वाटचालीत आलेल्या प्रसंगाबद्दल काही सांगायचे आहे का ?

माझा जन्म शेतकरी कुटुंबातील. माझी परीस्थिती गरिबीची होती. त्यात मी ना गाणं शिकू शकत होतो ना नीटसं जगु शकत होतो. या संपुर्ण प्रवासात अनेक वाईट-कटु प्रसंग आले - त्यातुन स्वत:च मार्ग काढीत मी त्यावर मात केली पण गाण्याची जिद्द काही सोडली नाही. अर्थात वेगवेगळ्या वेळी काही जणांची साथ मला मिळाली, हे ऋण मला मानलेच पाहिजे.
सगळेच प्रसंग हतबल करणारे नव्हते तर त्यातील काही जिद्द निर्माण करणारे होते. मी फक्त त्यातील विचारांना वेगळी दिशा दिली. म्हणजे खरं तर काही ठिकाणी अडचणी होत्या पण तिथे मी संधी शब्द टाकुन त्यातुन मार्ग काढला व गाणे आणि जीवण सुकर कसण्याचा प्रयत्न केला.
काही ठिकाणी मी अक्षरश: विहीर खोदून पाणी प्यायलो आहे. अर्थात परमेश्र्वर दयाघन माझ्या पाठीशी असल्यामुळे मला प्रकाशाचा मार्ग दिसत गेला.
परमेश्र्वराच्या कृपेने मी गात आहे याची जाणीव मला आहे. तोच माझ्याकडून कलेची साधना करवून घेतो ही माझी श्रध्दा आहे. आणि यातुनच रसिकांची उत्तोमोत्तम सेवा करता यावी हीच एक मनोकामना.
आपल्या सर्व शुभसंकल्पांना मनापासून शुभेच्छा !










मराठी गझल : श्रीकृष्ण राऊत


गझल हा कवितेचा आकृतिबंध आहे. फारसीतून अरबीत; अरबीतून उर्दूत; आणि उर्दूतून जवळपास सर्वच भारतीय भाषातल्या कवितांनी गझलच्या आकृतीबंधाला आपलेसे केले आहे.मराठीतही आज कवितेचा हा आकृतिबंध चांगलाच लोकमान्य आणि रसिकप्रिय झालेला आहे. यमकांच्या धाग्यात गुंफलेली दोन दोन ओळींच्या शेरांची माळ म्हणजे गझल.
            कवितेच्या इतर आकृतिबंधांच्या तुलनेत गझल अधिक यमकप्रधान आहे. कमीतकमी शब्दातल्या दोन ओळीत मानवी जीवनानुभवाचा एखादा पैलू इतक्या उत्कटपणे व्यक्त होतो की वाचणाज्याच्या-ऐकणाज्याच्या मनाला तो चटकन भिडतो. आणि तो शेर सहजपणे एका जिभेवरून दुसज्या, दुसरीवरून तिसज्या असा पुनरावृत्त होता होता त्याला सुभाषितत्वाचा दर्जा प्राप्त होतो.
मराठी कवितेत १९७५नंतरच्या अलिकडच्या पंचवीस वर्षांत गझलचा आकृतिबंध चांगलाच बहरलेला असला तरी त्याचा इतिहास मात्र २५०वर्षांपेक्षाही अधिक जुना आहे.
आतापर्यंतच्या संधोधनानुसार मराठीतले पहिले गझलकार होण्याचा मान अमृतराय या कवीकडे जातो. विदर्भातला बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील साखरखेर्डे हे अमृतरामांचे जन्मगांव. अमृतरामापासून तर उ. रा. गिरी, सुरेश भट पर्यंतचे महत्वपूर्ण गझलकार विदर्भातीलच आहेत. त्यामुळे मराठी कवितेला गझलच्या सशक्त आकृतिबंधाचे महत्वपूर्ण योगदान विदर्भानेच दिले आहे, हे महाराष्ट्राला मान्य करावेच लागेल.

अमृतरायांनी रचलेली -

'जग व्यापका हरीला नाही कसे म्हणावे ?

तंतू पटी मिळाले, भूमी नभापरी हो ।
घट - मृत्तिका निराळी ऐसे कसे म्हणावे '

ही मराठीतली पहिला ज्ञात गझल होय. तिचा लेखनकार अंदाजे इ. स. १७२९ समजला जातो.

           त्यानंतर मोरोपंतांची साधारणत: इ. स. १७८८ मध्ये रचलेली दोन पदे आढळतात.

'रसने! न राघवाच्या थोडी, यशात गोडी'

आणि

-हृदया ! बरे विचारी।नामस्मरे, न तापे '

ही दोन्ही पदे मांडणीच्या दृष्टीने गझलच्या आकृतिबंधाशी साम्य दर्शविणारी असली तरी ती मात्र मुळात गीतेच आहेत.

          १७८८ ते १८८० या जवळपास शंभर वर्षाच्या काळात मात्र मराठी कवितेत गझलचा आकृतिबंध संपूर्णपणे दूर्लक्षित राहिलेला दिसतो. त्याचे काय कारण असावे हे मात्र कळत नाही.नंतर १८८० मध्ये किर्लोस्करांच्या 'संगीत शाकुंतल' या नाटकात आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'संगीत वीरतनय' या नाटकातील काही पदे गझलच्या आकृतिबंधाची प्राथमिक रूपे वाटतात.
             मराठी गझलच्या प्रवासात माधव ज्युलियन हे महत्वाचे वळण आहे. फारसीचे अध्यापन आणि छंद शास्त्राचा व्यासंग माधव ज्युलियनांना गझलकडे घेऊन गेला. फारसीतली गझलांची वृत्ते शुध्द स्वरूपात मराठीत आणावीत म्हणून त्यांनी १९२० ते १९३३ या काळात शंभरावर गझला रचल्या. त्यांचा समावेश  १९३३ साली प्रसिद्ध    झालेल्या 'गज्जलांजली' नामक संग्रहात आहे.हटातटाने रचलेल्या त्यांच्या गझलातील कृत्रिमता आज वाचतांना आपल्याला चांगलीच बोचते. तरीपण गझलांच्या सदुसष्ट फारसी वृत्तांचा त्यांनी प्रात्यक्षिकासह मराठीला करून दिलेला परिचय ही त्यांची मराठी गझलला फार मोठी उपलब्धी आहे. माधव ज्युलियनांच्या गझलातील काही ओळी आजही लक्षात राहण्यासारख्या आहेत. उदाहरणार्थ -

लाज जरा, हास जरा, हास तू
लाजव या मत्त गुलाबास तू

किंवा

रूक्याची सोयरी सारी फुकाचा सोयरा कोठे ?
दुकाळी सोयजो पाही जिव्हाळा तो खरा कोठे ?

किंवा

भवानी आमची आई शिवाजी आमचा राणा
मराठी आमची बोली गनीमी आमचा बाणा

किंवा

सहधर्मिणी, तुज वाचुनी, दुनिया सुनी मज वाटते
फिरतो प्रसन्न उन्हात मी तरी अन्तरी तम दाटते.

माधवरावानंतर गझलकडे वळणारे महत्वाचे कवी विंदा करंदीकर. त्यांनी १९४१ मध्ये 'लाज' ही पहिली गझल लिहिली. जी त्यांच्या ‘स्वेदगंगा’या संग्रहात समाविष्ट आहे. 'सुरूवातीला गझलांकडे वळलो तो माधवरावांच्या प्रभावामुळे' असे ते एका मुलाखतीत कबूलही करतात. नंतर वीसेक वर्ष ते गझलच्या वाटेला जात नाहीत. आणि नंतर १९६० ते १९६५ या काळात त्यांनी १५ गझला लिहिल्यात. ज्यांचा समावेश १९६८ मध्ये प्रसिद्ध झालेलया 'जातक' या त्यांच्या कवितासंग्रहात आहे.

जेव्हा प्रदक्षिणा ती घालील मारूतीला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी !

किंवा

लिहिती बटा भालावरी उर्दू लिपीतील अक्षरे
हा जन्म माझा संपला ती वाचतांना शायरी.

किंवा

जो बाटलीत आहे आहेच तो बूचात:
हे सत्य नास्तिकांच्या डोक्यात हाणतो मी !

किंवा

खुश्शाल जा तू मंदिरी, त्याला तिला देण्याफुले
पण त्यातल्या एका फुला हुंगावया विसरू नको.

अशा कितीतरी सुंदर ओळी करंदीकरांच्या गझलात आढळत असल्या तरी त्यांच्या गझला माधवरावांच्या प्रभावातून काही सुटल्यासारख्या वाटत नाहीत.
करंदीकरांनी घेतलेल्या काव्यसंन्यासानंतर ‘मौज’ दिवाळी १९९९  मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या दहा गझला वाचल्या की त्यांनी काव्यसंन्यास घेतला होता, तेच बरे होते, असे प्रकर्षाने वाटल्यावाचून रहात नाही.
माधवराव ते सुरेश भट या गझल प्रवासातील करंदीकर आणि पाडगांवकर हे दोन टप्पे आहेत एवढेच फार तर आपल्याला म्हणता येईल.
१९८१ मध्ये पाडगावकरांचा 'गझल' संग्रह प्रकाशित झाला असला तरी त्यात समाविष्ट गझलांचा लेखन काळ १९६० ते १९८०  असा आहे.

'गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे '

असे जरी त्यांनी एका गझलेत म्हटले असले तरी गझलच्या आकृतिबंधाशी वरवर इमान राखणा-या पाडगावकरांना गझलचा आत्मा आत्मसात करता आला नाही, असेच म्हणावे लागते.
गझलच्या आकृतिबंधात यशस्वीरीतीने काव्य लेखन करणार्‍या उ. रा. गिरींच्या उल्लेखाशिवाय मराठी गझलचा इतिहास अपूर्णच राहील. त्यांनी लिहिलेल्या गझला एक पिंडी भावगीतासारख्या उलगडत जाणार्‍या  असल्याने त्या गझलांना उर्दूची संकल्पना स्वीकारायची तर 'गझल ए मुसलसल' म्हणता येईल.
अभ्यासक-समीक्षकांनी त्यांची गणना गझलकारात करू नये याचेही मोठे आश्चर्य वाटते. मराठी गझल १९२० ते १९८५ असा प्रबंध लिहून पुणे विद्यापीठाची पी. एच. डी. मिळविणाज्या प्रा. डॉ. अविनाश कांबळेच्या पुस्तकात उ. रा. गिरींचा साधा उल्लेखही नाही.त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे त्यांनी दोन ओळींच्या शेराची चार चरणात केलेली मांडणी. या मांडणीमुळे त्यांच्या गझलांचा आकृतिबंध दृश्य स्वरूपात कवितेसारखा नजरेस पडतो व वाचक समीक्षकांना हुलकावणी देतो.
१९६४ ते १९८१ या काळात त्यांनी लिहिलेल्या २९ गझलांचा समावेश १९८३ साली प्रसिद्ध झालेल्या 'मी एकटा निघालो' या त्यांच्या संग्रहात आहे.

खर्जात घर्घराया लागे दूरात जाते
ओवीतुनी मिसळले आवाज कंकणांचे

किंवा

मृदू रेशमी फुलांचा शयनास शेज होती
वक्षी विसावलेली तव सावळी अहंता

किंवा

थोड्याच तू क्षणांची दातार देवयानी
थोडा अजून प्यासा माझ्यातला ययाती

किंवा

सोडून चाललेले माझे मलाच गाणे
मी मैफलीत उरलो वर्ज्य स्वरा प्रमाणे

अशा कितीतरी सर्वांगसुंदर ओळी मराठी कवितेला देणार्‍या   गिरींना मात्र समीक्षेने अद्यापही उपेक्षितच ठेवलेले आहे.अनेकपदरी आशय देणारे शेर अट्टाहासाने रचून प्रत्येक शेर आशयदृष्ट्या स्वतंत्र करणार्‍या कृत्रिम गझल रचनेच्या तुलनेत गिरींचे कितीतरी शेर 'शेरास सव्वाशेर' असेच आहेत. त्यातील सहजता, भावोत्कटता, प्रतिमांचे नावीन्य कवितेच्या केवळ बाह्यांगावर लक्ष केंद्रीत करणार्‍या समीक्षकांना कसे लक्षात यावे ?

            गझलच्या  आकृतिबंधाला सर्वांत महत्वपूर्ण योगदान देणारे कवी म्हणजे सुरेश भट.१५ मार्च १९६१ ते  ११एप्रिल १९९४ या तेहतीस वर्षाच्या कालावधीत सुरेश भटांचे 'रूपगंधा', 'रंग माझा वेगळा', 'एल्गार' आणि 'झंझावात' हे चार कविता संग्रह प्रसिध्द झालेत. ज्यात चार संग्रह मिळून २०४ गझला आहेत. गझलांची एवढी मोठी संख्या एकाच कवीच्या नावावर मराठीत पहिल्यांदाच आढळते.
                       १९७४ ते १९८३ या कालखंडात त्यांच्या गझलांना चांगलाच बहर आल्याचे जाणवते. हे खरे असले तरी 'रंग माझा वेगळा' मधील गझलांच्या तुलनेत नंतरच्या गझला थोड्या डाव्याच वाटतात. ह्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे सुचतील तेवढे शेर गझले मध्ये कोंबण्याची वृत्ती.
               गझल हा कवितेचा आकृतिबंध आहे. तिच्याकडे एक कलाकृती म्हणून पाहतांना एकंदर प्रभावाच्यादृष्टीने विसविशीतपणा टाळावा लागातो. इतर शेरांच्या तुलनेत डावे असणारे अनेक शेर वगळावे लागतात. परिणामाची एकसंधता राखण्यासाठी शेरांची गझलेतील अपरिहार्यता जोखावी लागते. आणि महणूनच जास्तीत जास्त आठ शेरांची गझल लिहिणारे हिन्दीचे दुष्यंतकुमार गझलकार म्हणून थोर वाटतात. त्याचे कारणही हेच आहे.
           'रंग माझा वेगळा' पर्यंतच्या गझलांचा आपण सूक्ष्मपणे अभ्यास केला तर त्या एकपिंडी भावगीता सारख्या वाटतात.प्रत्येक शेर आशयदृष्ट्या स्वतंत्र असला पाहिजे ही अलीकडच्या उर्दू गझलची खासीयत 'एल्गार' पासून पुढेच त्यांच्या गझलात आढळते.
'एल्गार' मधील 'दीपदान' आणि झंझावात मधील 'बोलणे' ही गझल तेरा शेरांची आहे. दहा-अकरा-बारा शेरांच्या अनेक गझला 'एल्गार' आणि झंझावात मध्ये आढळतात. तर 'रंग माझा वेगळा' मध्ये जास्तीत जास्त आठ शेरची गझल आढळते.

सुरेश भटांच्या गझल लेखनात 'रंग माझा वेगळा' हा एक आणि त्यानंतर 'एल्गार' आणि 'झंझावात' मधील गझलांचा दुसरा असे दोन टप्पे सरळ सरळ पाडता येतात.
'रंग माझा वेगळा' पर्यंतच्या त्यांच्या गझलांचे त्याच संग्रहातील इतर भावकवितेशी दृढ नाते आहे. म्हणून त्या आशयदृष्ट्या एकपिंडी भावगीतांसारख्या वाटतात. पण म्हणून त्यातील काव्यात्म गुणवत्ता कुठेही उणी पडते असे नव्हे. उलट आपण चारही संग्रह एकत्र वाचले तर 'रंग माझा वेगळा' तील मुसलसल गझलाच एकसंध परिणामाच्या दृष्टीने अधिक उजव्या वाटतात.
उदाहरणार्थ-

लाजुनी झाले गुलाबी दु:ख माझे देखणे
ही तुझी श्वासात आली लाघवी आमंत्रणे

किंवा

आसवांनो माझिया डोळ्यातुनी वाहू नका
अंतरीच्या वेदना सा-या जगा दावू नका.

ह्या चार चार शेरच्या गझला असूनही उत्कृष्ट वाटतात. गझलमध्ये कमीत कमी पाच शेर असलेच पाहिजेत. ह्या व्याख्यात्म निकषाला पक्के चिकटून राहणारे सुरेश भट त्यांना अपूर्ण गझला म्हणत असले तरी त्या परिपूर्ण वाटतात. आणि किमान पाच शेरच्या व्याख्यात्म निकषाला निकालात काढतात.

              'रंग माझा वेगळा' नंतर प्रत्येक शेरचा दुसर्‍या  शेरशी आशयदृष्ट्या संबंध नसलाच पाहिजे अशी गझलेची नकारात्मक व्याख्या स्वीकारल्याने आशयदृष्ट्या येणारे पुनरावर्तन 'एल्गार' आणि 'झंझावात' मध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसते. वास्तविक 'गझलमध्ये एका शेरचा दुसर्‍या शेरशी संबंध असतोच असे नाही' अशी व्याख्या सेतू माधवराव पगडींनी 'उर्दू काव्याचा परिचय' या ग्रंथात केली आहे. 'असतोच असेही नाही' म्हणजे असूही शकतो ही होकारात्मकता संपूर्णपणे टाळून संबंध नसतोच अशी नकारात्मक व्याख्या स्वीकारल्यामुळेही 'एल्गार' आणि 'झंझावात' मधील गझलांना आशयाच्या पुनरावर्तनाचा शाप भोवला असावा, असे वाटते.
पण तरीही-

'बांधू हवेत किल्ला बाका बुलंद यंदा
या क्रांतीकारकांचा आवाज बंद यंदा'

किंवा

'आज घालू नका हार माझ्या गळा
मी कुणाचा कळा कापला यार हो'

किंवा

'भयमुक्त गोजिर्‍यांनी स्वातंत्र्य धन्य केले
ही भाकरीच साली अमुचा करी चुराडा

हे आणि असे अनेक भावोत्कट शेर दुसर्‍या सुरेश भटांनी गझलच्या आकृतिबंधाचे मराठी कवितेला दिलेले भक्कम आणि महत्वपूर्ण योगदान मान्यच करावे लागते.